टीम महाराष्ट्र देशा : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘उत्तर प्रदेश स्थापना दिवस’ कार्यक्रम संपन्न झाला. उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यांदरम्यान ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या संकल्पनेच्या माध्यमातून सांस्कृतिक देवाण-घेवाण वाढविण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मुंबईत राहणारे उत्तर प्रदेशातील नागरिक इथल्या संस्कृतीशी एकरुप झाले, तर आपसातील गोडव्याची कमतरताच राहणार नाही. असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.
सांताक्रुज भागातील लायन्स क्लब मैदानात राज्यपाल कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्रात राहणाऱ्या उत्तर प्रदेशीय नागरिकांसाठी शुक्रवारी (२४ जानेवारी) अभियान संस्थेमार्फत ‘उत्तर प्रदेश स्थापना दिवस’ समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
भारतमाता की जय, जय महाराष्ट्र या जयघोषात भाषणास सुरूवात करून राज्यपाल म्हणाले, उत्तर प्रदेशात अयोध्याविना राहावलं जात नाही आणि अयोध्या म्हटले की शरयू नदी किनारीस्थित राम जन्मभूमीचे स्मरण होते. शरयू नदी ज्या ठिकाणाहून उगम पावते त्याच नदी किनारी माझा जन्म झाला असल्याने उत्तर प्रदेशाशी असाही माझा संबंध आहे. मी अर्ध्यापेक्षा जास्त आयुष्य उत्तर प्रदेशात राहिलो, शिकलो आहे. त्यामुळे मी आजही स्वत:ला उत्तर प्रदेशचा मानतो.
देशात उत्तर प्रदेश सर्वात मोठे राज्य तर आहेच; परंतु सर्वात मोठं हृदय असलेला हा प्रदेश असला पाहिजे. मोठ्या मनाने वाटचाल कराल तर महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण राष्ट्र आपलंसं वाटेल. त्यामुळे ही भूमिका ठेवून वाटचाल करावी तसेच ज्या राज्यात आपण राहतो, त्या राज्याचीही सर्वांनी काळजी घेतली पाहिजे असे आवाहनही कोश्यारी यांनी यावेळी केले.
या सांस्कृतिक कार्यक्रमात उत्तर प्रदेशातील लोकगीत, नृत्यकला, काव्य, सुप्रसिद्ध लोककलावंतांकडून सादर करण्यात आल्या. या कार्यक्रमाला उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक, पद्मश्री कैलाश खेर, उत्तर प्रदेशचे सांस्कृतिक कार्य मंत्री निळकंठ तिवारी, अभियान संस्थेचे संस्थापक अमरजीत मिश्र आदी मान्यवर उपस्थित होते.


