🕒 1 min read
पुणे : लॉकडाउन लागू होऊन १४ दिवस पूर्ण झाले आहेत. या काळात महाराष्ट्रासह देशातील करोनाग्रस्त रुग्णांची संख्या प्रचंड वेगानं वाढली आहे. देशाच्या तुलनेत महाराष्ट्रात करोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असली तरी मृत्यूच्या प्रमाणात गुजरात (८.३३ टक्के) पहिल्या क्रमांकावर आहे. त्याखालोखाल पंजाब (७.८९ टक्के)आणि हिमाचल प्रदेश (७.६९ टक्के ) या राज्यांची नोंद असल्याचे वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अहवालातून समोर आलं आहे.
गर्दी कमी झाली असली, तरी संसर्ग होण्याचा वेग कमी झालेला दिसत नाही. त्यामुळे महाराष्ट्रासह काही राज्यातील लॉकडाउन लांबणार असल्याचं चित्र दिसत आहे. विशेषत: मुंबई, पुणे, ठाणे, पिंपरी-चिंचवड या शहरांसह राज्यातील करोनाग्रस्त जिल्ह्यातील लॉकडाउन कायम ठेवण्याच्या दिशेने सरकार विचार करत आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात मुंबईनंतर पुणे शहरात करोनाचा सर्वाधिक संसर्ग झाला आहे. पुण्यात मागच्या काही तासांत करोनामुळं पाच जणांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत करोना बळींची संख्या १३ वर गेली आहे.महाराष्ट्र टाईम्सने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.
सकाळापासून शहरातील नायडू रुग्णालयात -1, नोबेल रुग्णालयात – 1 आणि ससून रुग्णालयात 3 अशी एकूण 5 जणांचा मृत्यूची नोंद झाली आहे. महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी याबाबत माहिती दिली आहे.पुणे शहरात आज अखेर 1567 नागरिकांनी करोनाची तपासणी केली असून त्यापैकी 1417 नागरिकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहे. तर 158 रुग्ण बाधित आढळले आहेत. तसेच या दरम्यान 17 जणांना घरी सोडण्यात आले आहे.

