टीम महाराष्ट्र देशा : पश्चिम महाराष्ट्रात पावसाने थैमान घातल्याने कोल्हापूर, सांगली, कराड आदी भागांत प्रचंड पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेकांचे संसार उद्धवस्त झाले आहेत. हजारो नागरिक बेघर झाले आहेत. अशा आपत्तीग्रस्त नागरिकांना मदत मिळावी, यासाठी अनेक संस्था आणि प्रशासकीय यंत्रणा पुढे आल्या आहेत. कोल्हापूर – सांगली जिल्ह्याची आजची परिस्थिती पाहता काहीशी दिलासा दायक आहे. कारण अलमट्टी धरणामधून साडेचार लाख क्युसेक विसर्ग सुरू झाल्याने कोल्हापुरात पाण्याची पातळी कमी झाली आहे. तर सांगलीतही पाण्याची पातळी काही अंशी कमी झाली आहे.
राज्यात गेल्या आठवड्यात धुव्वाधार पाऊस झाला होता. खासकरून पश्चिम महाराष्ट्रात या पावसाचा जोर सर्वाधिक होता. या पावसामुळे कोल्हापूर – सांगली या भागातल्या नद्या दुथडी भरून वाहू लागल्या. त्यामुळे धरण देखील धोक्याच्या पातळीवर गेली. नाईलाजाने कोयना धरणाचे दरवाजे उघडावे लागले. त्यामुळे दुथडी भरून वाहणाऱ्या नद्या पात्र सोडून वाहू लागल्या. नदी काठी असलेल्या गावांना याचा फटका सुरवातीला बसला. जसजसा धरणातून पाण्याचा विसर्ग वाढू लागला. तसतस नद्यांनी देखील रुद्र रूप धरण केले.
मात्र आता राज्य सरकारच्या शिफारसी नंतर कर्नाटक राज्याने अलमट्टी धरणामधून साडेचार लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग केला. त्यामुळे कोल्हापूर येथील परिस्थिती आटोक्यात येत आहे. मात्र सांगली जिल्ह्यातील धास्ती अजून कायम आहे. शिरोळ तालुक्याची परिस्थिती अजूनही गंभीर आहे. कोल्हापूर शहर, चिखली, आंबेवाडी येथील पूरग्रस्तांसाठी मोठ्या प्रमाणावर मदत सुरू झाली आहे. अन्नधान्य, तयार अन्न, औषधे, कपडे, सॅनिटरी नॅपकिन इथंपासून ते अगदी पेस्ट, ब्रशपर्यंत अनेक जीवनोपयोगी वस्तू पुरवल्या जात आहेत. पावसामुळे स्थलांतरासाठी अडचणी आहेत. पूरबाधित गावात लोकांच्या खाण्यापिण्यासाठी बोटीतून साहित्य प्रशासन यंत्रणा पाठवत आहे.सुमारे ७७ छावण्यामध्ये पूरग्रस्त दाखल झाले आहेत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

