दीपक पाठक : राज्यभरात सध्या सर्वत्र उत्साहात गणेशोत्सव सुरू आहे . प्रत्येक गणेशोत्सव मंडळात काही निस्पृह कार्यकर्ते असतात. ज्यांच्याशिवाय हा उत्सव पूर्ण होऊच शकत नाही असे चमकोगिरी न करता तसेच समोर न येता पडेल ती सर्व कामे करणारे काही कार्यकर्ते असतात. अशाच निस्पृह कार्यकर्त्यांबद्दल जेव्हा मी विचार करतो तेव्हा आमच्या मंडळाचा धडाडीचा कार्यकर्ता (खर म्हणजे सर्वेसर्वा )अकबर पठाण याचचं नाव माझ्या समोर येतं.
करमाळा तालुक्यातील कोंढेजमध्ये माझं बालपण गेलं. धनगर गल्ली मध्ये त्यावेळी आमच्या पेक्षा वयाने मोठ्या मंडळींचं मंडळ होतं. आम्ही त्यावेळी वयाने बुद्धीने सगळ्याच दृष्टीने लहान होतो . मंडळाचे पदाधिकारी जी आज्ञा देतील ती शिरसावंद्य मानून आम्ही सर्व काम विना तक्रार करायचो पण तरीही लहान असल्याने आम्हाला विशेष काही महत्व दिलं जात नव्हतं. आमच्या वेगवेगळ्या उपक्रमांविषयीच्या कल्पनाची फुलं अक्षरशः पायदळी तुडवली जात आहेत असं आम्हाला वाटायचं .
एक वर्षी धाडस करून आम्ही बंडखोरी करत वेगळ मंडळ स्थापन केलं. त्या मंडळाला रामलिंग गणेश तरुण मित्र मंडळ असं नाव देण्यात आलं . अकबर हा त्यावेळी आमच्या सर्वात मोठा होता. एका जीप वर वाहकाच काम करून थोडीफार कमाई करत असल्याने नेतृत्व त्याचाकडेच देण्याचं ठराव झाला मात्र त्याने नेतृत्व करण्यापेक्षा कार्यकर्ता बनून राहणे पसंत केलं. तिकडच्या मंडळात पडेल ती काम करणाऱ्या पोरांची आता या मंडळात वेगवेगळ्या पदांवर नियुक्ती करण्यात आली.
बंडखोरी गल्लीतच केली असल्याने उत्सवासाठी वर्गणी जमवणे अतिशय अवघड काम होते. आम्ही अकबर ला पुढे करून वर्गणी मागायला जात असू कारण व्यवहार फक्त त्यालाच कळत असत. तेव्हा एका गल्लीत दोन गणपती कशाला ?असा सर्रास प्रश्न विचारून आम्हाला हाकलून दिल जात असे. आम्हाला लोकांच्या अशा वागण्याचा प्रचंड राग येत असे मात्र अकबर लोकांचे टोमणे निमुटपणे ऐकून घेत असे. जमेल तेवढी वर्गणी जमवून जुन्या हेमाड पंथी रामलिंग मंदिरात आम्ही स्वतःचा गणपती बसवला.
अकबर हा मुस्लीम आहे, वेगळ्या धर्माचा आहे असले फालतू विचार कधी आमच्या डोक्यात कधीच आले नाहीत.अकबर हा अष्टपैलू कार्यकर्ता होता. समंजस,व्यवहारी, प्रेमळ, सर्वसमावेशक विचार करणारा, असे बरेच गुण त्याच्या अंगी होते. मंडप उभारणे, लाईट ची व्यवस्था, ही त्याची प्रमुख नेमून दिलेली कामे. मात्र याशिवाय कार्यकर्त्यांमधील भांडण सोडवणे , प्रसादाची व्यवस्था आदी कामे तो न सांगता करीत असे.
पुढे ज्या मंडळाच्या विरोधात बंडखोरी केली होती ते मंडळ खालसा झाले. आणि त्याची जागा आमच्या मंडळाने घेतली . गावातील सर्वात मोठ मंडळ म्हणून नावारूपाला आल्यानंतर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच आयोजन तसेच सामाजिक उपक्रमा राबवले जाऊ लागले. या सर्व उपक्रमात अकबर चा सहभाग आणि उत्साह लक्षवेधी असायचा.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
