🕒 1 min read
मुंबई : जून 2018 पासून राज्यात प्लॅस्टिकबंदी असतानाही बिनदिक्कतपणे प्लॅस्टिकचा वापर करणाऱयांना 1 मार्चपासून चांगलाच दणका बसणार आहे. यामध्ये प्रतिबंधित प्लॅस्टिक आढळल्यास थेट पाच हजारांचा दंड वसूल केला जाणार आहे.
दुसऱ्या गुन्ह्यासाठी दहा हजार तर तिसऱ्या गुन्ह्यासाठी 25 हजारांचा दंड आणि तीन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा होणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना उद्या 1 मार्चपासून कापडी पिशवीच वापरावी लागणार आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी कालच 1 मेपर्यंत महाराष्ट्र ‘प्रतिबंधित’ प्लॅस्टिकमुक्त करण्यासाठी कार्यवाही करण्याचे निर्देश दिल्यानंतर पालिकेने ही धडक कार्यवाही सुरू केली आहे.
पर्यावरणरक्षण आणि संवर्धनासाठी मुंबईसह राज्यभरात 23 जून 2018 पासून प्लॅस्टिकबंदी लागू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेकडून बाजार, दुकाने-आस्थापना आणि अनुज्ञापन विभागातील 310 निरीक्षकांच्या ‘ब्ल्यू स्कॉड’च्या माध्यमातून कारवाई सुरू आहे.निळा कोट आणि काळी टोपी घातलेल्या निरीक्षकांकडून विविध ठिकाणी तपासणी सुरू आहे. असे असले तरी मुंबईत सध्या अनेक ठिकाणी सर्रासपणे प्लॅस्टिक पिशव्यांसह बंदी घातलेले प्लॅस्टिक वापरले जात आहे. त्यामुळे पालिकेने आता प्लॅस्टिकबंदीची कारवाई तीव्र करण्याचा निर्णय घेतला असून मे 2020 पर्यंत मुंबई ‘सिंगल युज डिस्पोजेबल प्लॅस्टिकमुक्त’ करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
हेही पहा –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

