🕒 1 min read
बीड: जिल्ह्यात कोरोनाची लाट कमी होण्याचं काही नाव घेत नाहीये. रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. रुग्णांची वाढ व त्याच सोबत वैद्यकीय सुविधांचा तुटवडा या मुळे रुग्णांची हाल होत आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत नागरिकांचा लसीकरणाकडे कल वाढलेला दिसत आहे. कोरोना रुग्ण अनेक वेळा गृह विलागीकारणाला पसंती देत आहेत मात्र यामुळे त्यांच्याकडे योग्य लक्ष दिले जात नाही व त्यामुळे संसर्ग वाढण्याचा धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे गृह विलगीकरण बंद करण्याच्या सूचना आमदार सुरेश धस यांनी केल्या आहेत.
कोरोना महामारीची परिस्थिती गंभीर होत चालली असून वेळीच कोरोना आटोक्यात आणण्यासाठी वेळीच उपचारही घेणे आवश्यक आहे. त्यामुळे तालुक्यातील ज्या-ज्या गावात गृह विलगीकरणात रुग्ण आहेत, त्यांना तत्काळ कोविड सेंटरला ठेवावे. सद्यस्थितीत गृह विलगीकरण थांबवावे, अशा सूचना आमदार सुरेश धस यांनी दिल्या. पाटोदा येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते.
या बैठकीला उपविभागीय अधिकारी शिंदे, तहसीलदार रमेश मुंडलोड, गट विकास अधिकारी अनंत्रे, गट शिक्षण अधिकारी शेळके, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.लक्ष्मीकांत तांदळे, एपीआय महेश आंधळे यांच्यासह अधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. आमदार धस म्हणाले, पाटोदा तालुक्यात कोरोना या महामारीची परिस्थिती अतिशय गंभीर होत चालली आहे. ११ टक्क्यांवरुन ती आता ३० टक्क्यांकडे जात असून ही खुप मोठी गंभीर बाब आहे. ज्या ज्या गावात पॉझिटीव्ह पेशंट गृह विलगीकरणात आहेत त्यांना तत्काळ कोविड सेंटरवर हलवावे. कारण गृह विलगीकरणातील रूग्ण एका जागेवर बसत नाही. इतरत्र फिरत राहतात व त्या मुळे गावात या रोगाचा जास्त फैलाव होत आहे. गृह विलगीकरण बंद करण्यासह काम नसताना रस्त्यावर फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी सूचना धस यांनी दिली.
महत्वाच्या बातम्या
- मराठा मंत्र्यांना त्यांचे मंत्रीपद टिकवायचंय, मराठा आरक्षण नाही ; नारायण राणेंचा घणाघात
- ‘रेमडेसिवीर बारामतीत मिळते पण जामखेडला नाही’, माजी मंत्री राम शिंदेंची पवारांवर टीका
- बीडला मिळाला श्वास; ३७१ ऑक्सिजन कॉन्संट्रेटर्स जिल्ह्यास प्राप्त
- ‘कोरोनामुळे मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना गोपीनाथ मुंडे विमा योजनेचा लाभ द्या’, शिवसंग्रामची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
- पत्रकारांच्या सुरक्षेची काळजी घेणं हे आपले कर्तव्य ; फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र


