🕒 1 min read
बुलडाणा : ग्रामीण भागातील कुटुंबप्रमुख आणि प्रत्यक्ष शेतीत कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला तर त्यांचा स्व. गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेत समावेश करून कुटुंबियांना लाभ देण्यात यावा, अशी मागणी शिवसंग्राम संघटनेच्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, गेल्या एका वर्षापासून संपूर्ण राज्यात शेतकऱ्यांची लॉकडाऊन आणि कोरोनामुळे प्रचंड दुर्दशा झाली आहे. यावर्षी शेतमालाला चांगला भाव असल्यामुळे दिलासा मिळाला. परंतु कोरोनाने पुन्हा थैमान घातले आहे. बहुतांश परिवारामध्ये रुग्ण आढळल्याने शासन व प्रशासन पूर्णपणे हतबल झाले आहे. त्यामुळे ग्रामीण भागात आरोग्याच्या सोयीअभावी शेतकरी कुटुंबातील प्रमुख लोकांच्या मृत्यूचे प्रमाण प्रचंड वाढत आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कुटुंबाला आर्थिक आणि सामाजिक अशा दोन्ही हेळसांडीला सामोरे जावे लागते.
बहुतांश शेतकरी परिस्थितीअभावी विमा घेत नाही. कुठलीच आर्थिक सुरक्षा कुटुंबाकडे राहत नाही. त्यामुळे शासनाने शेतकरी कुटुंबातील कोरोनाने मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांना ‘स्व.गोपीनाथ मुंढे अपघात विमा योजने’चा लाभ देण्याची तरतूद करावी. यामुळे राज्यभरातील शेतकरी कुटुंबांना आधार मिळेल, असे देऊळगाव राजा येथील शिवसंग्राम संघटनेने म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी करा-काँग्रेस
- राज्याच्या अधिकारातील सवलती मराठा समाजाला द्या, काँग्रेसची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
- आरोपमुक्त करण्याची विनंती करणे आरोपीचा अधिकार-सर्वोच्च न्यायालय
- अडचणीत वाढ; परमबीर सिंहांविरोधात तक्रारीच्या चौकशीचे गृहविभागाचे आदेश
- ‘टीका करण्याऐवजी सल्ले द्या’, राजनाथ सिंहांचा काँग्रेसला टोला


