टीम महाराष्ट्र देशा – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाउनच्या काळात अत्यावश्यक सेवा, वैद्यकीय सेवा वगळून सगळी दुकानं बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र केंद्र सरकारने काल रात्री उशिरा काही निर्देश जारी करत काही व्यवहारांना सूट दिली. मात्र असा कोणताही राज्य सरकारने घेतलेला नाही असं राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. ABP माझा मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
काय म्हणाले आरोग्यमंत्री राजेश टोपे –
‘३ मेपर्यंत महाराष्ट्रात कोणतीही दुकानं सुरु होणार नाहीत असं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. केंद्र सरकारने काल रात्री उशिरा काही निर्देश दिले आहेत. ज्यानुसार काही दुकानांना, व्यवहारांना केंद्र सरकारने संमती दिली आहे. मात्र जोपर्यंत राज्य शासन यामध्ये निर्णय घेत नाही तोपर्यंत महाराष्ट्रात असलेली दुकानं सुरु करण्याचा काही प्रश्नच येत नाही. काल रात्री केंद्राने काही निर्णय घेतले आहेत. मात्र अद्याप राज्य सरकारने असा कोणताही निर्णय घेतलेला नाही’ असं टोपे यांनी म्हटलं आहे.
‘लॉकडाउन हा कदाचित ३ मेपर्यंत जसा आहेत तसाच सुरु राहिल. ३ मे नंतरच याबाबतीतला निर्णय होईल. मी कदाचित अशासाठी म्हणतो आहे की २७ एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंग आहे. त्यावेळी काही वेगळा निर्णय घेतला गेला तर तो माननीय मुख्यमंत्री सांगतीलच’ असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.
महाराष्ट्रात समूह संसर्ग नाही-
‘महाराष्ट्रात समूह संसर्ग नाही, तसंच अद्याप आपण तिसऱ्या स्टेजलाही गेलो नाही. ग्रीन झोनच्या सीमा बंद ठेवाव्या लागतील. तसंच प्लाझ्मा थेरपी आणि पूल टेस्टिंगला संमती मिळाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्याशी चर्चा झाली त्यांनी महाराष्ट्रातल्या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतला’ असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.
हेही पहा –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

