टीम महाराष्ट्र देशा : दिवंगत नेते माजी उपमुख्यमंत्री आर आर पाटील यांनी स्वतः हून गडचिरोलीचे पालकमंत्री पद मागून घेतले. दर महिन्याला ते नक्षल भागामध्ये जात होते. राज्याचा गृहमंत्री दुचाकीवर नक्षल भागामध्ये फिरत असल्याने अधिकारी देखील चिंता व्यक्त करायचे. एक गृहमंत्री स्वतःहून तेथील जबाबदारी घेतो, लोकांमध्ये जात विश्वास निर्माण करतो. मात्र दुसरीकडे सध्याचे गृहमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस हल्ला झाल्यावर केवळ श्रद्धांजली देण्यास जातात. अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे.
राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी शरद पवार यांनी आज राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सर्व आमदार आणि पदाधिकाऱ्यांची बैठक मुंबईत घेतली. यावेळी बोलताना पवार यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरचे असल्याने ते नक्षलवादाच्या प्रश्नावर जास्त भर देतील अशी अपेक्षा होती, मात्र ते कितीवेळा गडचिरोलीला गेले माहित नाही. नक्षलवाद्यांनी हल्ला केल्यानंतर ते तिकडे गेल्याचं दिसले, नक्षल भागावर सरकारचे जास्त लक्ष नसल्याने हल्याची घटना झाली, त्यामुळे फडणवीस यांना पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही. असा घणाघात शरद पवार यांनी केली आहे.
गडचिरोली – चंद्रपूरचा काही भाग विकासापासून लांब राहिल्याने लोकांमध्ये नाराजी निर्माण झाली. या नाराजीचा फायदा घेवून नक्षल प्रवृत्ती जन्माला आली. हा प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकारची जबाबदारी असताना मी अनेकवेळा त्या भागामध्ये गेलो होतो. गडचिरोली – चंद्रपूरचा विकास करण्यासाठी अर्थसंकल्पात वेगळी तरतूद आपण केली होती, असं पवार यावेळी म्हणाले.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

