टीम महाराष्ट्र देशा – राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यातील १६ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. सुरक्षा ताफ्यातील पोलीस, सहाय्यक, स्वयंपाकी आणि स्वच्छता कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे मंत्री जितेंद्र आव्हाड हेही आता होम क्वारंटाईन झाले आहेत. मात्र, त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जितेंद्र आव्हाड यांच्या सुरक्षेसाठी कार्यरत असलेल्या ५ पोलिसांसह त्यांचे सहाय्यक, बंगल्यातील स्वयपाकी, स्वच्छता कर्मचारी आणि काही कार्यकर्त्यांचा यात समावेश आहे. सुरावातीला १३ जणांना लागण झाली होती. त्यानंतर आणखी तीन रुग्णांची झाली आहे. स्वतः जितेंद्र आव्हाडही होम क्वारंटाईनमध्ये आहेत.
ठाण्यात जितेंद्र आव्हाड यांचा मतदारसंघ असलेल्या कळवा मुंब्रा परिसरात सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. गेल्याच आठवड्यात जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या कळवा मुंब्रा मतदारसंघात जाऊन नागरिकांना घरी बसण्यास बजावलं होतं. जीवाशी खेळू नका, घराबाहेर पडाल, तर १४ दिवस तुरुंगात पाठवण्याची तरतूद केली आहे, अशी ताकीदच त्यांनी दिली होती. सोमवारी एकाच दिवशी ठाण्यात आता ३० नवे रुग्ण सापडल्याने ठाणेकरांच्या चिंतेत भर पडली आहे.
दरम्यान, जितेंद्र आव्हाड हे मुंब्र्यातील ‘कोरोना’ पॉझिटिव्ह पोलिसाच्या संपर्कात आले होते. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून त्यांनी घरात ‘सेल्फ क्वारंटाइन’ होण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र आव्हाड यांची टेस्ट ही निगेटिव्ह आली आहे. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील मंत्र्याने खबरदारीसाठी ‘सेल्फ क्वारंटाइन करण्याची ही पहिली वेळ असेल.
शरद पवारांकडून चौकशी –
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जितेंद्र आव्हाड यांची फोन वरून चौकशी केली. याबाबत जितेंद्र आव्हाड यांनी फेसबुकवर माहिती दिली आहे. या चौकशी बद्दल सांगतांच त्यांनी एक भावनिक पोस्टही लिहिली आहे.
पोस्ट
‘अचानक साहेबांचा फोन आला. आवाजामध्ये एक माया, आपलेपणा, काळजी हे सगळ दिसत होत. जितेंद्र कसा आहेस. मी म्हटल साहेब सगळ ठिक आहे. नक्की ना माझ्यापासून काही लपवत नाहीस ना. मी म्हटल नाही साहेब. सगळ्या कार्यकर्त्यांची काळजी घे आणि आता थोडासा घरी राहून लढाई लढ. मग म्हटल साहेब ८० हजार खिचडी वाटपाच काय करायच. त्यावरती ते काहीच बोलले नाहीत.
शांत पण अस्वस्थ. गरीबा बद्दल त्यांची तळमळ आम्ही ओळखुन आहोत
पण, साहेब तुम्ही कॅन्सर सारख्या दुर्धर रोगाने आजारी असताना देखील आमची लढाई लढत होतात. आतातर ही महाराष्ट्राच्या जनतेची लढाई आहे. प्रसंग बाका आहे, पण शरणागती घेता येणार नाही.
तुमचेच संस्कार
लोकांसाठी लढायचे
एक फोन आणि जादू झाली
आशीर्वाद असावेत!
हेही पहा –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
