टीम महाराष्ट्र देशा : राजधानी दिल्लीत प्रदर्शित करण्यात आलेल्या पुस्तकावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. नरेंद्र मोदींची तुलना शिवाजी महाराजांशी करणारे एक पुस्तक प्रदर्शित करण्यात आले आहे. पुस्तकाचे नाव ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ असे आहे. जय भगवान गोयल नावाच्या भाजप नेत्याने हे पुस्तक लिहिले असून त्यांनी ट्विट करून पुस्तक प्रदर्शित केल्याची माहिती दिली आहे.
दिल्लीच्या भाजप कार्यालयात शनिवारी ‘धार्मिक सांस्कृतिक संमेलन’ आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात नरेंद्र मोदी यांच्यावर लिहिण्यात आलेले ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’पुस्तक प्रदर्शित करण्यात आले, अशा आशयाचे ट्विट गोयल यांनी केले आहे. मात्र, भाजप पक्षाशी संबंधित कोणत्याही ट्विटर खात्यावर याबाबतची माहिती दिलेली नाही.
युनायटेड हिंदू फ्रंटचे कार्यकारी अध्यक्ष आणि भाजपचे वरिष्ठ नेते जय भगवान गोयल यांनी यांच्या हस्ते पुस्तकाचे अनावरण करण्यात आले. भाजप दिल्ली प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी, प्रभारी श्याम जाजू, माजी खासदार महेश गिरी या नेत्यांच्या उपस्थितीत प्रकाशन सोहळा पार पडला.दरम्यान आता याच मुद्द्यावरून विविध स्तरातून प्रतिक्रिया येवू लागल्या आहेत. खा. संजय राऊत आणि खा. संभाजीराजे भोसले यांच्यात या मुद्यावरून शाब्दिक चकमक सुरु आहे.
भाजपमध्ये शिरलेल्या छत्रपतींच्या वंशजांना ही तुलना मान्य आहे की नाही ते त्यांनी स्पष्ट करावं असं आवाहन संजय राऊत यांनी उदयनराजे भोसले, कोल्हापूरचे संभाजीराजे आणि शिवेंद्रराजे भोसले यांना केलं होतं . या वक्तव्याचा संतापलेल्या संभाजीराजे यांनी चांगलाच समाचार घेतला होता . छत्रपती संभाजीराजे यांनी आपल्या ट्विटमध्ये संजय राऊतांचा एकेरी उल्लेख करत त्यांना करड्या शब्दात समज दिली आहे.
संभाजीराजे म्हणाले, ‘उद्धवजी संजय राऊत यांच्या जिभेला लगाम घाला. ते प्रत्येक वेळी छत्रपती घराण्यावर गरळ ओकून राजकारण करत आहेत. त्यांनी आधी माहिती घ्यायला पाहिजे होती, की मी जिजाऊ जयंतीमध्ये (सिंदखेड राजा) काय बोललो आहे ते. त्यांची मुजोरी सहन केली जाणार नाही,’ असे या ट्विटमध्ये खासदार संभाजीराजे म्हणाले.
यावर आता संजय राऊत यांनी पलटवार केला आहे. “महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचे सातारा कोल्हापूरचे जे वंशज आहेत. ते सर्व भाजपमध्ये आहेत. त्यामुळे मग या दोन्ही गाद्या आहेत त्यांचा महाराष्ट्राला सन्मान आहे त्या प्रमुख लोकांनाही शिवाजी महाराजांची तुलना योग्य आहे की नाही याबद्दल भूमिका घ्या असे जर मी म्हटलं किंवा जनतेने सांगितलं तर चिडाचीड करण्याचे कारण नाही. तुमची नेमणूक भाजपने केली. कोणी भाजपचे आमदार आहेत. कोणी खासदार आहेत. कोणी माजी खासदार आहे. तुम्ही वंशज आहात. त्याबद्दल आम्हाला आदर प्रेम आहे. याचा अर्थ तुम्ही भूमिका घेऊ नये का? छत्रपती शिवाजी महाराजांच्या मान सन्मानाबद्दल आमच्यासारख्या सर्व सामान्यांनी लढायचं आम्ही लढू आम्ही शिवसैनिक आहोत. तुम्ही तर त्यांचे वंशज आहात. तुम्ही त्यांचे नातं सांगता. मग तुमची जबाबदारी सर्वात जास्त आहे. तुम्ही पटकन राजीनामे दिले पाहिजेत. देणार आहात का?ते न करता तुम्ही संजय राऊतांवर आगपाखड करताय. हा काय प्रकार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशीही याबाबत चर्चा झाली त्यांनीही तुमची भूमिका योग्य आहे, असे ते म्हणाले.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
