मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा आपल्या सामना अग्रलेखाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘संविधान दिनी’ केलेल्या भाषणावर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.
राऊत लेखात म्हणाले आहेत की, संविधान दिनाचे निमित्त साधून पंतप्रधान मोदी यांनी त्यांचे महनीय विचार प्रकट केले आहेत. त्यात शुद्ध विचार किती व राजकीय विरोधकांवर हल्ले किती ते पाहावे लागेल. शुक्रवारी देशात संविधान दिवस साजरा करण्यात आला. यानिमित्ताने संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये मुख्य कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात मोदी यांनी ‘नाव’ न घेता काँग्रेसवर टीका केली. मोदी म्हणतात, ‘पार्टी फॉर द फॅमिली, पार्टी बाय द फॅमिली’ हे लोकशाहीला घातक आहे. संविधान निर्मात्यांनी देशाच्या हिताला प्रथम प्राधान्य दिले. आता देशहित मागे पडले आहे असे पंतप्रधान मोदी म्हणत आहेत.
पुढे राऊत म्हणले की,’निवडणूक आयोगापासून न्यायालयापर्यंत सरळसरळ हस्तक्षेप सुरूच आहे. राज्याचे अधिकार मारले जात आहेत. हा संविधानाचा खून आहे. मंत्रिमंडळाच्या शिफारशी राज्यपाल मानायला तयार नाहीत. कारण ज्या पक्षाने त्यांची नेमणूक केली त्याच पक्षाचे आदेश ते पाळतात. ही संविधानाची वाताहत आहे. राज्यव्यवस्था मोडून काढणारे काम पेंद्रीय राज्यकर्ते करतात तेव्हा त्यांना ‘संविधान दिवस’ साजरा करण्याचा अधिकार उरत नाही. ‘फॅमिली पार्टी’ व ‘हुकूमशाही पद्धतीने चालवली जाणारी पार्टी’ या दोन्ही लोकशाहीला घातक आहेत. आज देशात प्रादेशिक पक्षांचा बोलबाला आहे. यातील अनेक ‘पाटर्य़ा’ ‘फॅमिली पार्टी’ म्हणूनच ओळखल्या जातात. याच ‘फॅमिली पाटर्य़ां’चे कडबोळे करून एनडीएचे सरकार वाजपेयींच्या नेतृत्वाखाली सत्तेवर आले होते. ममता बॅनर्जी असतील अथवा तेजस्वी यादव, अखिलेश यादव, नवीन पटनायक यांचे पक्ष ‘फॅमिली पार्टी’तच मोडतात. द्रमुक, अण्णा द्रमुकही वेगळे नाहीत. पण लोकांनी या पक्षांना आपापल्या राज्यात सत्तेवर आणले आहे व मोदींच्या पक्षांना तेथे वारंवार पराभव पत्करावा लागला हे सत्य आहेच.
दरम्यान, बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली. शिवसेनेने राष्ट्रीय राजकारणात क्रांती केली. मराठी बाणा, हिंदुत्व, राष्ट्राभिमान अशा विषयांवर शिवसेनेची मते ठाम आहेत. शिवसेना म्हणजे स्वाभिमान हे आता समीकरण बनले आहे. उलट राष्ट्रीय पक्ष बोलतात एक व करतात दुसरेच. लोकशाहीचा मुखवटा लावून देशात एकाधिकारशाहीचा सध्या सुरू असलेला खेळ संविधानाच्या विरोधात आहे. संविधानात सत्याचा जय व राष्ट्रहिताला महत्त्व आहे. ते आज होत आहे काय? पंतप्रधान मोदी यांनी संविधान दिनी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये भाषण दिले. याच हॉलमध्ये स्वातंत्र्याशी नियतीचा करार झाला. मोदी आता नवी संसद निर्माण करीत आहेत. या संसदेत ‘सेंट्रल हॉल’च नाही. त्यामुळे पुढच्या ‘संविधान दिनी’ पंतप्रधान भाषण करणार कुठे?, असा सवालही यावेळी राऊतांनी केला.
महत्वाच्या बातम्या:
- …तर आरोग्याची बंधने पाळावीच लागतील- मुख्यमंत्री ठाकरे
- दक्षिण आफ्रिकेतून स्वदेशी परतलेल्या व्यक्तीला नव्या व्हेरिएंटचा संसर्ग?
- कायदे मंजूर करताना परिणामांचा विचार न केल्याने समस्या- एन.व्ही.रमण
- …तर राजकीय विरोधकांवर टीका हाच एकमेव कार्यक्रम कसा ठरू शकतो?- संजय राऊत
- ‘काँग्रेसची सूत्रे गांधी घराण्याकडे असणे व भाजपची सूत्रे पंतप्रधानांच्या मुठीतल्या व्यक्तीकडे असणे हे सारखेच’


