सांगली : सध्या जगभरात ‘व्हॅलेंटाईन डे’ची चर्चा सध्या सुरु आहे. तरुणाईमध्ये या आठवड्याला विशेष महत्त्व आहे. या तरुणाईत अगदी कॉलेजपासून तर राजकीय क्षेत्रातील तरुणांचाही समावेश आहे. तसेच राष्ट्रवादीचे युवा नेते आणि आमदार रोहित पवार यांनी देखील आपल्या प्रेम कहाणीबाबत दिलखुलासपणे भाष्य केलं आहे.
ते सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे के. बी. पी. कॉलेजच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमात बोलत होते. यावेळी बोलताना रोहित पवार यांनी दिल्ली निवडणुकीच्या निकालावरही भाष्य केलं. ते म्हणाले, ‘दिल्लीत भाजपनं अहंकार दाखवला. मात्र, ‘आप’ने त्यांचा पराभव केला. यात सत्याचाच विजय झाला, असं मत रोहित पवार यांनी व्यक्त केलं.
तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की, ‘मी मुंबईमध्ये होतो. या सर्व प्रवासात काही प्रमाणात कष्टावर प्रेम होतं. त्यावेळी जीम करायचो. जीमवर प्रेम होतं. पण कॉलेजमध्ये तुम्हा सर्वांना जे प्रेम होतं तसं प्रेम मला काही कधी झालं नाही. व्हॅलेंटाईन डे दोन दिवसांनी येतो आहे. तेही मला व्हॉट्सअॅपवर मेसेज पाहत असताना तेव्हा कळालं की दोन दिवसांनी व्हॅलेंटाईन डे आहे. पण बरं झालं आठवलं. तुम्ही सर्वजण ज्या प्रकारच्या प्रेमाचा विचार करतात, तसं प्रेम आयुष्यात मी एकदाच केलं. ते प्रेम माझ्या बायकोवर केलं. हेच प्रेम शेवटपर्यंत राहणार आहे,’ असे ते म्हणाले.
दरम्यान, ‘कॉलेजचं जीवन खूप भारी असतं. मलाही कॉलेजचं जीवन आवडायचं. तेव्हा टेंशन अजिबात नव्हतं. घरुन दोन हजार रुपये महिन्याला यायचे. त्यातच कसातरी महिना निघायचा. कधी पैसे कमी पडले, तर मित्र असायचेच,’ असे म्हणत रोहित पवार यांनी काँलेज मधील दिवसांच्या आठवनींना उजाळा दिला.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
