टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या पक्षांतराचे वारे वाहत आहे. आघाडीतील बरेच नेते शिवसेना किंवा भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार यांनी पक्षांतर करणाऱ्या नेत्यांना फेसबुक पोस्टद्वारे टोला लगावला आहे.
रोहित पवार पवार यांनी ‘संधी आणि संधीसाधू या दोन शब्दात खूप मोठ्ठा फरक आहे. पक्षाने संधी दिली आणि ते संधीसाधू ठरले. आजही नेत्यांच्या नावापुढे राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्या किंवा नेते असं लावलं जातं आणि त्यानंतरच त्यांची दखल घेतली जाते. हे त्यांना देखील माहित आहे. त्यामुळे प्रत्येकाने एक गोष्ट जरूर लक्षात ठेवावी आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नसता तर आपणास आमंत्रण देण्यासाठी कोणीही आलं नसतं. तसंही पक्ष सोडून जाणाऱ्या लोकांची व्यक्तिगत कारणे असतील देखील पण एखाद्या व्यक्तीच्या पक्ष सोडून जाण्याने पक्ष संपत नसतो. यातूनच नवी भरारी घेता येते. तसंही भाकरी बदलण्याचा विचार करताना भरडं पीठ आपोआप बाजूला गेलेलं कधीही चांगलंच असतं अशा शब्दात पक्षांतर करणाऱ्या नेत्यांवर टीका केली आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादीच्या बऱ्याच नेत्यांनी पक्षांतर केले आहे. नुकतेच मुंबईतील राष्ट्रवादीचे नेते सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. तसेच अहमदनगर जिल्ह्यातील अनेक नेते पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

