मुंबई : महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार ज्या संजय राऊतांमुळे आलं, त्यांच्यावरच शिवसेनेने अन्याय केला. किमान त्यांना ‘सामना’चं संपादकपद तरी द्यायला हवं होतं, असे म्हणत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे.
ठाण्यातील मो. ह. विद्यालयात शांताबाई कृष्णा कांबळे यांच्या 97 व्या वाढदिवसानिमित्त केंदीय मंत्री आठवले उपस्थित राहिले होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, ‘मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जर प्रांतवादाची भूमिका सोडली, तर त्यांचं महायुतीत स्वागत आहे. परंतु त्यांच्या येण्यामुळे, किंवा न येण्यामुळे महायुतीला काहीही फरक पडणार नाही,’ असे आठवले म्हणाले.
तसेच शिवसेनेपाठोपाठ मनसे आणि भाजपनेही ‘औरंगाबाद’ शहराचे ‘संभाजीनगर’ असं नामांतर करण्याचा आग्रह धरला असतानाच भाजपच्या मित्रपक्षाचा मात्र विरोधाचा सूर आहे. औरंगाबाद जिल्ह्याचं नाव बदलण्यास रिपाइं अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी विरोध दर्शवला आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यानंतर संपादक पदी राहण्यात अडचणी येऊ शकतात. अशी शक्यता असल्याने शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाचे संपादक पद मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. सामनाच्या प्रेसलाईन मध्ये संपादक म्हणून सौ. ठाकरे यांचे नाव रविवारपासून लावण्यात आले आहे.
२३ जानेवारी १९८९ रोजी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सामना हे मुखपत्र सुरु केले. त्यांच्या निधनानंतर उद्धव ठाकरे यांच्याकडे सामनाच्या संपादकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. सामना वृत्तपत्र सुरु झाल्यापासून रश्मी ठाकरे या तिसऱ्या संपादक बनल्या आहेत. शिवसेना नेते खासदार संजय राऊत हे सामनाच्या कार्यकारी संपादकपदी कायम आहेत.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

