ठाणे : औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलण्यास रिपाइंचा विरोध आहे. कोणत्याच भागाचे जुने नाव बदलले जाऊ नये, असे पक्षाला वाटते. मात्र राज्य शासनाने जर ठरवले, तर नावात बदल केला जाऊ शकतो, असं केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले.
ठाण्यातील मो. ह. विद्यालयात शांताबाई कृष्णा कांबळे यांच्या 97 व्या वाढदिवसानिमित्त केंदीय मंत्री आठवले उपस्थित राहिले होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, ‘दिल्लीमधील दंगलीला काँग्रेस आणि आम आदमी पक्षच जबाबदार आहेत. त्यांनी ठरवले असते तर ही दंगल थांबू शकली असती. परंतु ‘आप’च्या नगरसेवकाने ही दंगल भडकवली. काँग्रेसने ती आणखी भडकवली, असा आरोपही आठवले यांनी केला. केंद्रात आमचे सरकार असल्याने दंगलीसाठी आम्ही कसे जबाबदार? असा प्रतिप्रश्न त्यांच्यावर आरोप करणाऱ्यांना त्यांनी विचारला.
पुढे बोलताना ते म्हणाले की, ‘महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार ज्या संजय राऊतांमुळे आलं, त्यांच्यावरच शिवसेनेने अन्याय केला. किमान त्यांना ‘सामना’चं संपादकपद तरी द्यायला हवं होतं, असे म्हणत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यानंतर संपादक पदी राहण्यात अडचणी येऊ शकतात. अशी शक्यता असल्याने शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाचे संपादक पद मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. सामनाच्या प्रेसलाईन मध्ये संपादक म्हणून सौ. ठाकरे यांचे नाव रविवारपासून लावण्यात आले आहे.


