🕒 1 min read
जळगाव – राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी हॉटेल, रेस्टॉरंट व्यावसायिकांसाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून त्यांना मदत करण्याची मागणी केली आहे. पवारांच्या या पत्राची जोरदार चर्चा सुरु असताना आता भाजप खासदार रक्षा खडसेंनी शरद पवारांना लिहिले आहे.
आपण बार आणि हॉटेल मालकांची तत्काळ दखल घेतली. त्याचप्रमाणे सामान्य शेतकरी, शेतमजूर, बारा बलुतेदार, वाजंत्रीवाले आणि हातावर पोट असलेल्या कष्टकरी कुटुंबांचा आक्रोशही महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते या नात्याने मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचवावा. या कठीण काळात थोडाफार का होईना परंतु, या घटकांना दिलासा द्यावा, अशी मागणी करणारे पत्र खडसेंनी केली आहे.
गेले वर्षभर कोरोना महामारीमुळे सतत सुरू असलेल्या लॉकडाऊन व जिल्हाबंदीमुळे शेतकरी संकटात सापडला आहे. शेतमालाला भाव नाही, केंद्र सरकारचे पॅकेज वगळता राज्य सरकारकडून कोणत्याही प्रकारची मदत नाही. जिल्हाबंदीमुळे वाहतूक बंद आहे. बाजार समित्या बंद असून हाताशी पैसा नसल्याने कर्जबाजारी होण्याची वेळ शेतकऱ्यावर आलेली आहे. अवकाळी पाऊस आणि वादळांसारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे शेती उत्पादनाचे प्रचंड नुकसान होत असून उभी पिके नष्ट करण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे. शेतात ओतलेला पैसा मातीत गेला असून शेतकरी कधी नव्हे एवढा निराशेच्या गर्तेत सापडला आहे. बाजार समित्यांमध्ये व्यवहार बंद झाल्याने नाशवंत शेतमालाची विल्हेवाट लावणेदेखील शेतकऱ्यास परवडेनासे झाले आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या मालाची विक्री करण्यासाठी राज्य सरकारकडून काही काळाची सवलत मिळायला हवी. यासाठी आपण पाठपुरावा करावा अशी मागणी त्यांनी केली आहे.
खडसे म्हणाल्या, बार आणि हॉटेल व्यावसायिकांप्रमाणेच शेतकरीदेखील संकटात सापडला आहे. वीजबिल माफी योजनेचा घोळ अजून संपलेला नाही. शेतकऱ्यांच्या थकित वीजबिलात ३३ टक्के सवलत देण्याची राज्याच्या अर्थमंत्र्यांनी केलेली घोषणा अजूनही शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचलेली नाही. दुष्काळी मदत आणि पिकविम्याच्या योजना शेतकऱ्यांपासून लांबच आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याचे कोणतेही नियोजन राज्य सरकारने याकाळात शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केलेले नाही. लॉकडाऊनमुळे जेव्हा इतर सर्व उद्योगधंदे बंद होते, तेव्हा शेतकरी मात्र शेतात राबून पिके घेत होता.
लॉकडाऊनच्या काळातही शेती व शेतीपूरक उद्योगच ग्रामीण कुटुंबांसाठी आधार असल्याने राज्य सरकारने अन्य उद्योगंधंद्यांप्रमाणे शेतकऱ्यांसाठीही पॅकेज जाहीर करावे. राज्यातील ९४ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात केंद्र सरकारप्रमाणे तातडीने ६ हजार रुपये जमा करावेत व तातडीने शेतकऱ्यांस मदत जाहीर करावी, शेतकऱ्यांसोबतच शेतमजूर, बारा बलुतेदार, वाजंत्रीवाले आणि हातावर पोट असलेल्या कष्टकऱ्यास मदत करण्यासाठीही पाठपुरावा केला पाहिजे अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी करा-काँग्रेस
- राज्याच्या अधिकारातील सवलती मराठा समाजाला द्या, काँग्रेसची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
- आरोपमुक्त करण्याची विनंती करणे आरोपीचा अधिकार-सर्वोच्च न्यायालय
- ‘टीका करण्याऐवजी सल्ले द्या’, राजनाथ सिंहांचा काँग्रेसला टोला
- ‘घरी कडी लावून बसलेल्यांना रिकामटेकडा म्हणतात’, भाजपचा मुख्यमंत्री ठाकरेंना टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

