टीम महाराष्ट्र देशा : आपली लढाई बाजारबुणग्यांशी नसून ज्यांच्याशी आहे त्यांनी तारीख, वार आणि मैदान ठरवावे. मी दोन हात करायाला तयार आहे, असे ओपन चॅलेंज कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी माजी खासदार राजू शेट्टी यांना दिले. दरम्यान, पुणे येथील कार्यक्रमात गोंधळ घालणाऱ्यांचा शेतकऱ्यांशी काडीमात्र संबंध नसल्याचा टोलादेखील खोत यांनी यावेळी लगावला. साताऱ्यात पत्रकारांशी ते बोलत होते.
मी ज्या ज्या ठिकाणी जाईन त्या त्या ठिकाणी गोंधळ घालण्याचा कार्यक्रम स्वाभिमानीने सुरू ठेवला आहे. वास्तविक त्यांनी लोकसभेला झालेला पराभव पाचवावा. उगाच कडक लक्ष्मी अंगात येऊन थयथयाट करण्यापेक्षा संघटनेची पडझड थांबवावी. येत्या विधानसभा निवडणुकीत 49 जागा लढविण्याची वल्गना करत आहेत. मात्र त्यांचा एकही आमदार यावेळी निवडून येणार नाही, असा टोला सदाभाऊ खोत यांनी लगावला आहे.


