टीम महाराष्ट्र देशा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज निवासस्थानी भेट घेतली आहे. या भेटीनंतर शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून दोघे एकत्र येणार असल्याची चर्चा आहे.
लोकसभा निवडणूक झाली आता राज्यात विधानसभेचे वारे वाहू लागले आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून राजू शेट्टी निवडणुकीच्या रिंगणात होते मात्र शिवसेनेचे उमदेवार धैर्यशील माने यांनी त्यांचा दारूण पराभव केला. याचदरम्यान, राजू शेट्टी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. परंतु या भेटीमध्ये दोघांमध्ये काय चर्चा झाली या बाबत अद्यापही समोर आले नाही.
परंतु, आगामी विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. याचदरम्यान या दोघांची भेट यावरून आगामी विधानसभेत राज ठाकरे आणि राजू शेट्टी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून एकत्र येणार असल्याची शक्यता आहे.
विशेष म्हणजे, राज ठाकरे यांच्या मनसेने काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून आक्रमक पवित्रा घेतला होता. इतकेच नव्हे तर, ठाणे येथे आंबा स्टॉलवरुन झालेल्या राड्यानंतर ठाण्यात मनसेकडून शेतकऱ्यांसाठी मोठा मोर्चा काढण्यात आला होता. तसेच, राज ठाकरे यांनी मनसे पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात लोकांची मदत करा अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.
राज ठाकरे यांच्या सूचनेप्रमाणे मनसे पदाधिकाऱ्यांकडून पाणीटंचाई असणाऱ्या भागात टॅँकरने पाणी पोहचविण्यासाठी व्यवस्था करण्यात येत आहे.
त्यामुळे, आगामी विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे आणि राजू शेट्टी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरुन एकत्र येणार असल्याची शक्यता वर्तवल्या जात आहे.


