अहमदनगर/ऋषिकेश घोगरे : अहमदनगर जिल्ह्यातील नेवासे तालुका उसासाठी ओळखला जातो त्याचप्रमाणे तालुक्यात मागील काही वर्षांत कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढल्याने आता तो राज्यातील कापूस उत्पादक तालुक्यांच्या यादीत गेला आहे. नेवासे तालुक्यासाठी मुळा सहकारी सुतगिरणीच्या प्रस्तावाला राज्याच्या वस्त्रोद्योग विभागाने मान्यता दिली असुन ऊसापाठोपाठ कापसाचे आगार असलेल्या नेवासे तालुक्यात मुळा सहकारी सुतगिरणीच्या माध्यमातून कापूस पिकावर आधारीत कृषी प्रक्रिया उद्योग सुरु करण्याच्या प्रक्रियेला चालना मिळणार असल्याची माहिती राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी दिली.
नेवासे तालुक्याला मुळा-प्रवरा-गोदावरी नदीचा स्पर्श झाल्याने येथे मोठ्या प्रमाणात ऊस पिकतो. पण आता काही शेतकरी ऊसाऐवजी कापसाच्या पिकाकडे वळले आहेत. राज्य शासनाच्या वस्त्रोद्योग धोरणानुसार कापुस उत्पादक तालुक्यात सुतगिरणीला परवानगी द्यायची असेल तर तालुक्यात वर्षाला किमान ९६०० टन कापसाचे उत्पादन आवश्यक असते. नेवासा तालुक्यात दरवर्षी १७ हजार ते २१ हजार हेक्टरवर कापसाची लागवड होत असुन १२ हजार ते २२ हजार टनापर्यंत कापसाचे उत्पादन होत असते. याबाबत राज्य शासनाकडे पाठपुरावा करुन १५ दिवसांपूर्वी नेवासा तालुक्याचा समावेश कापुस उत्पादक तालुक्याच्या यादीत करुन घेतला असुन आता सुतगिरणीच्या प्रस्तावालाही वस्त्रोद्योग विभागाची मान्यता मिळाली आहे. नागपुर येथील महाराष्ट्र राज्याच्या वस्त्रोद्योग आयुक्त श्रीमती माधवी खोडे-चावरे यांनी मुळा सहकारी सुतगिरणी या नवीन संस्थेला अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेत संस्थेचे खाते उघडण्यास परवानगी दिली असुन सभासदांकडून भाग भांडवल गोळा करण्याच्या प्रक्रियेला आता वेग येणार असल्याचे ना.गडाख यांनी सांगितले आहे.
नेवासे तालुक्यात दरवर्षी ऊसाच्या बरोबरीने किंवा त्यापेक्षा जास्त क्षेत्रावर कपाशीची लागवड होते. ऊस पिकावर प्रक्रिया करुन साखर निर्मिती करणारे कारखाने तालुक्यात सुरु झाले, पण आता सुतगिरणीच्या माध्यमातून आणखी एक कृषी प्रक्रिया उद्योग सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला असुन त्यामुळे तालुक्यातील कापुस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचा योग्य मोबदला मिळू शकेल. कारण वस्त्रोद्योगात सुत निर्मिती, कापड निर्मिती, कापड प्रक्रिया, रेडीमेड गारमेंट व होजिअरी इत्यादी अनेक उद्योगांचा समावेश असतो. हा प्रकल्प नेवासे तालुक्यातील वस्त्रोद्योगाची नांदी ठरणार आहे. सुतगिरणीची क्षमता २५२०० चात्यांची असुन प्रकल्प सुरु झाल्यावर तालुक्यातील तरुणांनाही रोजगाराची संधी उपलब्ध होईल. मुळा कारखान्याच्या माध्यमातून गेल्या ४० वर्षात तालुक्यात जे आर्थिक परीवर्तन झाले त्यात नियोजित सुतगिरणीच्या प्रकल्पाने आणखी भर पडेल अशी अपेक्षाही नामदार गडाख यांनी व्यक्त करुन जास्तीत जास्त शेतकरी व संस्थांनी या प्रकल्पासाठी आपला आर्थिक सहभाग द्यावा असे आवाहनही त्यांनी केले आहे.
महत्वाच्या बातम्या
- परीक्षा नियोजनाचे वाजले ‘तीन-तेरा’ ; पुणे विद्यापीठाचे शिक्षकेत्तर कर्मचारी संपावर !
- मराठवाड्यातील अतिवृष्टीचे पंचनामे करून तत्काळ मदत द्या, फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
- ‘चंद्रकांत पाटील म्हणतात पुन्हा पहाटे भूकंप होणार, त्यांनी काय गजर लावला आहे का?’
- शिर्डीत नगराध्यक्ष बदलाच्या हालचालींना वेग
- कोरोनासोबत जगताना आता आपल्याला जीवनशैलीत बदल करावा लागणार – उद्धव ठाकरे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

