टीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्रात गृह खात्यातली रिक्त पदं भरण्यासाठी शासन प्रयत्नशील असून लवकरच सात हजाराहून अधिक पदांसाठी पोलीस भर्ती केली जाणार असल्याचं राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं आहे. ते काल दर्यापूर इथं एका कार्यक्रमात बोलत होते.
अनिल देशमुख म्हणाले की, पोलीस भरतीसह विविध स्पर्धा परीक्षांसाठी ग्रामीण तरुणांनी तयारी करून अभ्यासात सातत्य ठेवले पाहिजे. गेल्या काही काळात घडलेल्या महिला अत्याचाराच्या घटना लक्षात घेऊन समाज कंटकांना जरब बसण्यासाठी कठोर कायदा आणण्याचा विचार असल्याचेही त्यांनी सांगितले.
अवैध सावकारी, नक्षलवाद यांना आळा घालण्यासाठी शासन महत्त्वाची पावले उचलणार आहे. भारतातील गुन्हे नोंदणी अहवालानुसार विद्यार्थी आत्महत्यांचे प्रमाण वाढले असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्यांवर अवास्तव अपेक्षांचे ओझे लादू नये. दिवं. बाबासाहेब सांगळूदकर यांनी दर्यापूर परिसरात शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात मोलाचे योगदान दिले. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन सर्वानी समाजाचा विकास घडवून आणावा, असे आवाहनही त्यांनी केले.
महिला अत्याचाराच्या घटना लक्षात घेता, समाजकंटकांना जरब बसण्यासाठी कठोर कायदा आणण्याचा विचार असल्याचं देशमुख यांनी सांगितलं. महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यावेळी उपस्थित होत्या, बालमजुरी रोखण्यासाठी आणि बालकांच्या सुरक्षेसाठी कायद्याची कठोर अंमलबजावणी केली जाईल, अशी माहिती ठाकूर यांनी यावेळी दिली.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

