नवी दिल्ली : ‘खासदारांनी या महारोगराईशी लढण्यासाठी पुढे यायला हवं. भारतीय हवाई दल आणि एअर इंडियाच्या क्रू मेंबर्सचा आपण विचार केला पाहिजे. जे लोक कोरोनाप्रभावित देशांतून भारतीयांना मायदेशात परत आणत आहेत. त्यांचाही विचार करायला हवा.’ असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदारांना चांगलेच फैलावर घेतले. तसेच, संसदेचं अधिवेशन थांबणार नाही. संसदेचं अधिवेशन हे ठरलेल्या 3 एप्रिलपर्यंत चालणार आहे. पंतप्रधानांनी या बैठकीत मीडियाचीही भूमिकाही स्पष्ट केली आहे.
दरम्यान, भारतातील रुग्णांची संख्या 148 पर्यंत पोहोचली आहे. तसेच आतापर्यंत कोरोनानं तीन जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील ही परिस्थिती पाहता त्याच पार्श्वभूमीवर संसदेत खासदारांनी कामकाज स्थगित करण्याची मागणी केली होती, त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी भडकले.
”खासदारांनी आपल्या जबाबदारीतून पळ काढू नये, अनेक जण मोठा धोका असतानाही कर्तव्य बजावत आहेत. मी जे ऐकतो आहे, ते योग्य नाही. खासदारांनी या महारोगराईशी लढण्यासाठी पुढे यायला हवं. भारतीय हवाई दल आणि एअर इंडियाच्या क्रू मेंबर्सचा आपण विचार केला पाहिजे. जे लोक कोरोनाप्रभावित देशांतून भारतीयांना मायदेशात परत आणत आहेत. तसेच कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर आणि नर्सेसचाही विचार करायला हवा. तळागाळातीलही लोकांचाही विचार व्हायला हवा. अशा वेळी जर कामकाज थांबवण्याचा निर्णय घेतल्यास काय होईल?, असा प्रश्नच मोदींनी उपस्थित खासदारांना विचारला आहे.
तर, संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मीडियाचं कौतुक केलं आहे. प्रसारमाध्यमांमधून कोविड-19च्या संबंधी लोकांना योग्यपद्धतीनं जागरूक करण्यात येत आहे. मोदींनी खासदारांना हात जोडून नमस्कारही केला आहे. तसेच प्रत्येक खासदारांना आपल्या मतदारसंघात जाऊन लोकांमध्ये जनजागृती करण्याचं अपील केलं आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

