यवतमाळ, दि. 25 : यावर्षीच्या खरीप हंगामात बहुतांश शेतकऱ्यांनी सोयाबीनची लागवड केली आहे. मात्र सोयाबीनचे बियाणे उगवलेच नाही, अशा तक्रारी मोठ्या प्रमाणात येत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सोयाबीन उत्पादक कंपन्यांनी बियाणे बदलून द्यावे किंवा नुकसान भरपाई द्यावी. अन्यथा बियाणे उत्पादक कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्यात येईल, असे जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड म्हणाले.
जिल्ह्यात न उगवलेल्या सोयाबीन बियाणांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात बियाणे उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला जिल्हाधिकारी एम.डी.सिंह, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर, खाजगी सचिव रवींद्र पवार, जि.प. कृषी विकास अधिकारी राजेंद्र घोंगडे तसेच बियाणे उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्ह्यात 9 लक्ष 2 हजार हेक्टरपैकी जवळपास अडीच लक्ष हेक्टरवर सोयाबीनची लागवड होते, असे सांगून पालकमंत्री राठोड म्हणाले, ज्या शेतकऱ्यांचे बियाणे पेरणीनंतर उगवले नाही, त्या शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे बिलासहित अर्ज दाखल करावा. महाबीजच्या धर्तीवर संबंधित कंपन्यांनी बियाणे बदलून द्यावे किंवा स्वत:च्या सीएसआर फंडमधून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोबदला द्यावा. मात्र असे न करणाऱ्या बियाणे उत्पादक कंपन्यांविरुध्द कडक कारवाई करण्यात येईल. प्रसंगी एफआयआरसुध्दा दाखल केला जाईल. यापुढे न उगवलेल्या बियाणांबाबत एकाही शेतकऱ्याची तक्रार येता कामा नये, असे निर्देशही त्यांनी दिले.
जिल्हाधिकारी सिंह यांनी सोयाबीन उत्पादक बियाणे कंपनीच्या प्रतिनिधींनी प्रत्यक्ष फिल्डवर जावून माहिती घ्यावी. जिल्ह्यात विकलेल्या बियाणांपैकी किती टक्के बियाणांबाबत तक्रारी आल्या आहेत, याबाबत दोन दिवसांत माहिती सादर करा, अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या. बैठकीला सारस, इगल, ऋची, अंकूर, ग्रीनगोल्ड या सोयाबीन बियाणे उत्पादक कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.
मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्थांच्या समस्यांबाबत सकारात्मक विचार करणार – धनंजय मुंडे
‘निजामुद्दीनच्या धार्मिक मेळाव्यात सहभागी झालेल्या नागरिकांनो लपून बसू नका’
‘निवडणूक कामांसाठी शिक्षकांची कमीत कमी सेवा घेण्याचा प्रयत्न करणार’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

