टीम महाराष्ट्र देशा : काँग्रेसकडून आपल्याला डावललं गेल्याचं सांगत मध्य प्रदेशातील काँग्रेसचे दिग्गज नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.हेच हेरून महाराष्ट्रातून मात्र राज्यसभेसाठी काँग्रेसने सावध पाऊले उचलत हिंगोलीचे माजी खासदार आणि महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रजनी सातव यांच्या मुलाला म्हणजेच राजीव सातव यांना उमेदवारी दिली आहे. अनेक दिग्गज नेत्यांची नाव चर्चेत असताना काँग्रेसने राजीव सातव यांच्या रुपाने राज्यसभेसाठी युवा नेतृत्वाला प्राधान्य दिल्याचं पाहायला मिळत आहे.
मध्यप्रदेशात राज्यसभेसाठी पक्षाने संधी न दिल्यानेच ज्योतिरादित्य यांनी भाजपची वाट धरल्याचं बोललं जात आहे. तसंच काँग्रेसकडून तरुण नेत्यांवर अन्याय होत आहे, असाही आरोप करण्यात येत आहे. अशातच महाराष्ट्रात मात्र काँग्रेसने मोठा निर्णय घेतला आहे.
तर दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचं धक्कातंत्र वापरल्याच दिसतंय.शिवसेनेतल्या दिग्गज नेत्यांना डावलून राज्यसभेसाठी उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसमधून आलेल्या प्रियंका चतुर्वेदी यांना उमेदवारी दिली आहे. लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान काँग्रेसच्या प्रमुख प्रवक्त्यांपैकी एक असलेल्या प्रियंका चतुर्वेदी या शिवसेनेत आल्या होत्या. त्यांचा हा प्रवेश सगळ्यांनाच धक्का देणारा होता.
इंग्रजी आणि हिंदी भाषेवर उत्तम पकड आणि दिल्लीच्या उच्चभ्रू ल्युटीयन्स वर्तुळात त्यांचा उत्तम जनसंपर्क आहे. त्याचबरोबर त्यांचं आदित्य ठाकरे यांच्याशी उत्तम ट्युनिंग आहे. त्यामुळे दिल्लीत शिवसेनेची बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी शिवसेनेने त्यांना उमेदवारी दिल्याचं बोललं जात आहे.
शिवसेनेत राज्यसभेची उमेदवारी मिळविण्यासाठी जोरदार लॉबिंग झालं होतं. माजी खासदार चंद्रकांत खैरे, ज्येष्ठ नेते दिवाकर रावते यांची नावं चर्चेत होती. मात्र या सगळ्यांना डावलत उद्धव ठाकरे यांनी प्रियंका चतुर्वेदींवर विश्वास दाखवला.
त्याचबरोबर केंद्रात सत्तेत असणाऱ्या भाजपनेही खेळी करत एक नवीन पत्ता काढला आहे.महाराष्ट्रात भाजपने तीन उमेदवारांची यादी जाहीर केली आहेत. त्यात दोन दिग्गजांना डावलून भाजपने मराठवाड्यातले पक्षाचे नेते डॉ. भागवत कराड यांना उमेदवारी जाहीर केली आहे. कराड हे गोपीनाथ मुंडे गटाचे नेते समजले जातात. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि बिल्डर असलेले संजय काकडे यांना डावलून भाजपने कराडांना उमेदवारी दिली आहे.
मराठवाड्यातले प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञअसलेले कराड हे पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते समजले जातात.कराडांची निवड हा खडसेंना धक्का मानला जातो. मात्र आपण दिल्लीसाठी उत्सुक नव्हतोच, राज्याच्या राजकारणात आपल्याला राहायचं आहे अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
