सोलापूर : सध्या द्राक्षाचा सिझन सुरू आहे. अनेक शेतकर्यांनी द्राक्षांची काढणी केली आहे. तो माल जागेवर पडून राहिल्यास खराब होण्याचा धोका ओळखून माजी सहकारमंत्री तथा आ. सुभाष देशमुख यांनी द्राक्षांच्या गाड्यांची वाहतूक नाशिकसह इतर ठिकाणी करावी, जेणेकरून शेतकर्यांचे नुकसान होणार नाही, अशी विनंती केली होती. त्याला जिल्हाधिकार्यांनी मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता शेतकर्यांना द्राक्षांच्या गाड्यांची वाहतूक करण्या परवानगी मिळाली आहे.
सध्या द्राक्ष काढणी झाली आहे. मात्र संचारबंदी असल्याने द्राक्षांच्या गाड्यांना वाहतुकीला अडचण येत होती. याबाबत द्राक्ष बागायत संघाचे सोलापूरचे अध्यक्ष आशिष काळे, राज्य उपाध्यक्ष शिवाजी पवार, डॉ. हविनाळे आदींनी आ.सुभाष देशमुख यांची भेट घेऊन परिस्थिती सांगितली. त्यानंतर तातडीने आ. देशमुख यांनी जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली आणि द्राक्ष गाडी अडवल्यास शेतकर्यांचे नुकसान होईल, असे सांगत द्राक्ष आणि मनुक्याच्या गाड्या न आडवण्याची विनंती केली. त्याला जिल्हाधिकार्यांनी मंजुरी दिली आहे. त्यामुळे शेतकर्यांची गाडी कोठेही अडणार नसल्याचे डॉ. हविनाळे यांनी सांगितले.
परराज्याच्या परवानगीसाठी गडकरींशी चर्चा
आ. देशमुख यांनी जिल्हाधिकारी आणि मुख्यमंत्र्यांशी चर्चा करत शेतकर्यांना राज्यात द्राक्ष वाहतुकीला परवानगी मिळवून दिली. आता परराज्यात म्हणजे ओरिसा, आंध्र प्रदेश, कोलकाता येथेही द्राक्ष वाहतूक सुरू करण्यासाठी आ. सुभाष देशमुख वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करत असल्याचे डॉ. हविनाळे यांनी सांगितले.


