🕒 1 min read
मोहोळ तालुका प्रतिनिधी – मोहोळ तालुक्यातील टाकळी शिकंदर येथील भीमा सहकारी साखर कारखान्यात गत वर्षी तयार झालेल्या साखरेची तब्बल १ लाख पोती गायब केली असल्याचा संशय आहे. त्यामुळे साखर गोदामातील स्टॉक चेक करून कारखान्याच्या अन्य कामकाजाची चौकशी करावी. तसेच भीमा कारखान्याला थक हमी मिळू नये अशी मागणी या भागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन सहकार विभागाच्या प्रधान सचिवांना देण्यात आले आहे.
सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ, मंगळवेढा आणि पंढरपूर तालुक्यातील ऊस उत्पादकांसाठी भीमा सहकारी साखर कारखाना अत्यंत महत्वाचा आहे. या कारखान्यावर माजी खा. धनंजय मुन्ना महाडीक यांची दुसऱ्यांदा सत्ता आल्यापासून या कारखान्याला उतरती कळा लागली आहे. गेल्या दोन वर्षांपासून भीमा कारखाना व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांचा पगार दिलेला नाही. सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचे फायनल पेमेंट अन् भविष्य निर्वाह निधी देखील भरलेला नाही. त्यामुळे या कामगारांना आमरण उपोषण करण्याची वेळ आली होती. शेवटी थोड्याफार रक्कमेची तरतुद करुन व्हा. चेअरमन यांनी कारखान्याची व मुन्ना महाडीकांची इज्जत वाचविण्याचा प्रयत्न केला होता.
तरीही भीमा कारखाना नेहमीच या ना त्या कारणाने नेहमीच वादाच्या भोवऱ्यात असतो. कारखाना व्यवस्थापनाने ऊस उत्पादकांना एफआरपीप्रमाणे भाव दिला नाही. त्यामुळे ऊस उत्पादकांची चेअरमन मुन्ना महाडीक यांच्यासह संचालक मंडळावर प्रचंड नाराजी आहे. गत वर्षी कारखान्याच्या गोडाउन मध्ये उपलब्ध असलेल्या साखरेवर कारखान्याने विविध बँकांचे कर्ज घेतलेले असून ती साखर बँकेच्या कर्जासाठी तारण ठेवलेली आहे. मात्र गोडाऊन मधील एकूण साखर पोत्यांपैकी एक लाख साखरेची पोती गायब केली असल्याचा संशय ऊस उत्पादक शेतकऱ्यांसह सभासदांना आहे.
त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी प्रभाकर सावंत, किसन पवार, राजाभाऊ भंडारे, राजकुमार पाटील, अशोक चव्हाण, शिवाजी सातपुते, अशोक क्षिरसागर यांनी भीमाच्या साखर गोडाऊनची तपासणी करून साखर पोत्यांची तपासणी करावी. तसेच या कारखान्याला थक हमी देऊ नये, अशी मागणी सहकार विभागाच्या प्रधान सचिवांकडे लेखी निवेदनाद्वारे केलेली आहे. त्यामुळे मोहोळ सोलापूर जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
दरम्यान भीमा व्यवस्थापनाने विरोधकांनी हे षडयंत्र असल्याचे सांगत, भीमा कारखाना चालू होऊ नये. यासाठी विरोधक आटोकाट प्रयत्न करीत आहेत. त्यात यश मिळत नसल्याने विरोधकांनी खालच्या टोकाला पातळीवर जाऊन काही सभासदांना हाताशी धरत हिन दर्जाचे राजकारण सुरू केले असल्याचे स्पष्ट केले आहे. वास्तविक पाहता एम ए सी बँकेच्या गोडाऊन कीपर च्या देखरेखीखाली गोडाऊन आहे. त्यामुळे साखर पोती गायब होण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे देखील नमूद केले आहे. महत्वाची बाब म्हणजे भीमा साखर पट्ट्यातील ऊस उत्पादक आणि कष्टाने उडवलेला ऊस वजनात काटा न मारता गाळपासाठी आम्ही सध्या असल्याची ग्वाही देखील भीमा व्यवस्थापनाने दिली आहे.
भीमा शुगरचे व्हाईस चेअरमन सतीश जगताप यांनी या संदर्भात ‘महाराष्ट्र देशा’ला प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणतात, चालू वर्षी भीमा कारखाना क्षेत्रात १४ लाख टन उसाची नोंद झाली असून दहा लाख टन गाळप करण्याचे उद्दिष्ट आहे. भीमा कार्यक्षेत्रात असणाऱ्या उसावर काही कारखानदारांचा डोळा आहे. म्हणूनच त्यांनी या निवेदन कर्त्याशी संगणमत करुन कारखाना बंद पाडण्याचे षड्यंत्र सुरु केले आहे. विरोधकांना राजकारणच करायचे असेल तर त्यांनी किमान निवडणुका येईपर्यंत तरी वाट बघावी. भिमाचे सुज्ञ सभासद जो निर्णय घ्यायचा आहे तो घेतीलच.
महत्वाच्या बातम्या-
हिंदू मुलींची पठाण मामानं केली पाठवणी!
राज्यासह परराज्यांत प्रवासासाठी ‘ई-पास’ची गरज नाही : केंद्र सरकार
राज्यासह देशातील अन्य राज्यातील पात्र शिधापत्रिकाधारकांना पोर्टेबिलिटीद्वारे होणार अन्नधान्य उपलब्ध
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

