मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गरीबांसाठी 10 रुपयांत शिवभोजन थाळी देण्याची घोषणा केली. नागपूर अधिवेशनातील या घोषणेनंतर दोनच दिवसांत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत शेतकरी कर्जमुक्ती आणि शिवभोजनाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. कर्जमुक्ती पाठोपाठ आता गरीबांना सकस आहार देणाऱ्या शिवभोजन योजनेचीही सुरुवात होत असून याविषयीचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. यानुसार आता महाराष्ट्रातील प्रत्येक जिह्यात ‘शिवभोजन’ दिले जाणार आहे.
पहिल्या टप्प्यात पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात शिवभोजन सुरू होणार आहे. या दोन्ही ठिकाणी दररोज सुमारे 1500 नागरिक या योजनेचा लाभ दुपारी 11 ते 2 या वेळात घेऊ शकणार आहेत. या भोजनालयात एकावेळी किमान 25 लोक बसू शकतील एवढी आसनव्यवस्था उपलब्ध असणे आवश्यक आहे.
या थाळींची संख्या मर्यादीत असल्याने या योजनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. कारण, साधारण 2 कोटींच्या आसपास लोकसंख्या असलेल्या मुंबईला फक्त 450 थाळ्या देण्यात आल्या आहेत. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आणि महापालिका क्षेत्रात सध्या एकच थाळी केंद्र सुरु करण्यात येत आहे. या जीआरमध्ये जिल्हानिहाय किती थाळ्या देण्यात येतील? त्याची आकडेवारी दिलेली आहे. मुंबई शहर आणि उपनगरसाठी केवळ 1950 थाळ्यांची तरतूद करण्यात आलेली आहे.
याशिवाय जेवण दुपारी 12 ते 2 या कालावधीमध्येच मर्यादित उपलब्ध असणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर जास्तीत जास्त 150 जणांना जेवण मिळणार आहे. यात तीस ग्रॅमच्या दोन चपात्या, शंभर ग्रॅम वाटीत भाजी, शंभर ग्रॅम वरण, दीडशे ग्रॅम वाटीचा भात अशी असेल थाळी असणार आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

