मुंबई : महाराष्ट्रातील येत्या २६ मार्चला सात राज्यसभा सदस्यांच्या जागांसाठी मतदान होणार आहे. भाजपचं विधानसभेतील संख्याबळ पाहता त्यांच्या वाट्याला यापैकी 3 जागा येत आहेत. यापूर्वी रामदास आठवले आणि उदयनराजे भोसले यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे. आता पक्षश्रेष्ठी एकनाथ खडसेंचाही विचार करत असल्याची माहिती समोर आली आहे.
महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून गेलेल्या 7 खासदारांचा कार्यकाळ एप्रिल महिन्यात संपत आहे. या 7 जागांसाठी लवकरच निवडणूक होणार आहे. भाजपकडून खडसेंची नाराजी दूर करण्यासाठी राज्यसभेचे तिकीट दिले जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, एकनाथ खडसे विधानसभा निवडणुकांपासून नाराज आहेत. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी खडसेंचे राजकीय पुनर्वसन करण्यासाठी त्यांना राज्यसभेची उमेदवारी देण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. तर दुसरीकडे सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत पराभवाचा धक्का बसलेले माजी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या राजकीय पुनर्वसन केले जाणार आहे. उदयनराजेंना राज्यसभेवर पाठवण्यासाठी भाजपने तयारी सुरु केल्याचं म्हटलं जातं आहे.
भाजपकडून राज्यसभेसाठी तीन उमेदवार जवळपास निश्चित झाल्याचे म्हटलं आहे. एकनाथ खडसे, रामदास आठवले आणि उदयनराजे भोसले यांना भाजपकडून राज्यसभेसाठी उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. फडणवीस सरकारमध्ये एकनाथ खडसे हे महसूल मंत्री होते. मात्र त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर त्यांना मंत्रिपद सोडावे लागले होते. त्यानंतर विधानसभा निवडणुकांपूर्वी आणि त्यानंतरही खडसेंनी भाजपवर अप्रत्यक्ष टीका केली होती.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

