टीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबाद दौऱ्यात पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला होता. ठाकरे हे १३,१४ आणि १५ फेब्रुवारीला तीन दिवसीय औरंगाबाद दौऱ्यावर होते.त्यावेळी त्यांनी पक्षाच्या चुकीच्या बातम्या पत्रकारांना पुरवणाऱ्या गद्दारांना पक्षातून हकलणार असल्याची घोषणा केली होती.
असा इशारा दिल्यानंतर आता प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात केली आहे. राज ठाकरे यांनी औरंगाबादेत मोठी कारवाई केली.मनसेचे जिल्हाध्यक्ष गौतम अमराव यांची हकालपट्टी केली. राज ठाकरे यांनी औरंगाबादच्या भर सभेत गद्दारांवर कारवाई करणार असल्याचा इशारा दिला होता. त्याची अंमलबजावणी करण्यास आता सुरुवात झाली आहे.
दरम्यान गौतम अमराव यांना पक्षविरोधी कारवाया करणे आणि पक्षादेश न पाळणे या कारणावरुन हकालपट्टी केली. मनसेच्या अंतर्गत गोटातील बातम्या फोडल्याचा संशय गौतम आमराव यांच्यावर होता. त्यातूनच त्यांची हकालपट्टी केली आहे.
त्याचबरोबर राज ठाकरे यांनी महापालिका निवडणुकांसाठी कामाला लागण्याचे आदेश दिले होते. हे शहर आपलं आहे. काम केलं तर महापालिकेवर आपण झेंडा फडकवणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता.
तर पाकिस्तानी आणि बांगलादेशी यांच्याविरोधात आपण मुंबईत मोर्चा काढला, देशातील गद्दारांना आपल्याला बाहेर काढायचं आहे. सध्या देशात सगळीकडे पाकिस्तानी आणि बांगलादेशी आढळत आहेत. मुंबईत तर अफगाणी लोक सापडले. असंही राज ठाकरे म्हणाले होते.आता यापुढे अशाच धडक कारवाया राज ठाकरे करतील अशी अपेक्षा पक्षाच्या कार्यकर्त्यांना आहे.


