गोंदिया : पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीचे निकाल जवळपास पूर्णपणे स्पष्ट झाले आहेत. सत्तेचा दावा करणाऱ्या भाजपला पराभूत करत ममता बॅनर्जींनी तिसऱ्यांदा पश्चिम बंगालची सत्ता मिळवल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळं ममता दीदींवर पुन्हा अभिनंदनाचा वर्षाव होतोय तर भाजपवर टीका होत आहे. महाविकास आघाडीतील अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्यावर जोरदार टीकास्त्र डागले आहे.
‘भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पश्चिम बंगालमध्ये गेल्या तीन वर्षांपासून आभास निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी अबकी बार २०० आकडे पार असे बोलून फेकाफेकीचे राजकारण केलं. आता निवडणुकीच्या निकालाचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे’, असं नवाब मलिक म्हणाले आहेत.
‘देशात कोरोनामुळे जी परिस्थिती निर्माण झालीय त्याची जबाबदारी घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली होती. मात्र, त्यावर अमित शाह यांनी जेव्हा जनता आम्हाला नाकारेल तेव्हात आम्ही राजीनामा देऊ, असं म्हटलं होतं. तेव्हा आता बंगालच्या जनतेने त्यांचा राजीनामा मागितला आहे. त्यामुळे अमित शाह आणि मोदी यांनी राजीनामा द्यावा’, अशी मागणी राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.
दरम्यान, आतापर्यंतच्या निकालाचा कल पाहता तृणमूल काँग्रेस पश्चिम बंगालमध्ये सहजपणे सत्तास्थापन करेल, असे दिसत आहे. तर ‘अब की बार २०० पार’ च्या वल्गना करणारा भाजप १०० जागांचा टप्पाही ओलांडेल की नाही, याबाबत शंका आहे. कोरोनामुळे मतमोजणीची प्रक्रिया संथरित्या सुरु आहे. त्यामुळे निकाल पूर्णपणे स्पष्ट होण्यासाठी संध्याकाळपर्यंत वाट पाहावी लागेल. मात्र, तुर्तास तरी ममता बॅनर्जी यांनी भाजपचे आक्रमण थोपवून पश्चिम बंगालचा गड राखला, असेच म्हणावे लागेल.
महत्वाच्या बातम्या
- तुम्ही जामिनावर सुटलेले आहात त्यामुळे जास्त जोरात बोलू नका, चंद्रकांतदादांचा भुजबळांना टोला
- गारखेड्यात दुकानाला आग लागून १५ लाख रूपयांचे नुकसान
- जिल्ह्याच्या ग्रामीण आरोग्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही : पालकमंत्री
- लग्नाच्या वाढदिवसाचा केक तलवारीने कापणारा जेरबंद
- संघांतून वगळल्यामुळे डेविड वॉर्नर निराश आणि आश्चर्यचकित झाला आहे : टॉम मूडी


