अहमदनगर/ ऋषिकेश घोगरे : महाविकास आघाडीचे सरकार जनमतच्या विरोधात जावून बनलेलं सरकार आहे. ह्या सरकारला तिन चाक असून, यातील चाकांची हवा कमी झाल्यानंतर ते भरण्याचे ठिकाण नेमकं मुंबईला, बारामतीला की संगमनेरला आहे हाच खरा प्रश्न आहे. आम्ही सरकार पाडू इच्छित नाही, ते त्यांच आपोआप पडणार आहे. महाविकास आघाडीचं सरकार चांगल चालावे अशी आमची देखील इच्छा आहे. मात्र ते चालवत नाहीत. अशी टीका खा.सुजय विखे यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली.
लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेले शिर्डीचे साईबाबा मंदिर साडेपाच महिन्यापासून बंद आहे. केंद्र सरकारने प्रार्थना स्थळे खुले करण्याबाबत आधिच अनुमती दिली आहे. मात्र राज्य सरकार निर्णय का घेत नाही असा सवाल खा. विखे यांनी उपस्थीत केला आहे. शिर्डीचे सर्व अर्थकारण येणाऱ्या भाविकांवर अवलंबून असल्यानं सध्या तरी येथील सर्व व्यवहार ठप्प होताना दिसत आहे. तरी सध्याची परिस्थीती लक्षात घेता नागरिकांच्या इतर गरजा देखिल आहेत. मुलांच्या शाळा-कॉलेजची फी भरणे आहे. त्यामुळे येथील अर्थकारण पुन्हा सुरळीत होण्यासाठी पाऊलं उचलण्याची गरज आहे.
साईबाबा मंदिर खुले करण्यासाठी नगरपंचायतीचे पदाधिकारी आणि ग्रामस्थांचे सह्यांचे पत्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पाठविणार असल्याचे खा. सुजय विखे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे. दरम्यान, खासदार डॉ.सुजय विखे यांनी नुकतेच श्रीरामपूर शहरात रिक्षा चालविण्याचा अनुभव घेतला होता. रिक्षात माजी सभापती व जिल्हा परिषद सदस्यांना बसविले. तीन चाकी रिक्षा चालविणे हे कठीण आहे. कशाचाच अंदाज येत नाही. त्यामुळे राज्यातील तीन पक्षांचे सरकार तरी कसे चालत असेल? असा टोलाही त्यांनी लगावला.
पूरग्रस्तांना तातडीने मदत करा – नाना पटोले


