नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते राहुल गांधी कोरोना, लॉकडाऊन यासह विविध मुद्द्यांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोदी सरकारवर निशाणा साधत आहेत. आता पुन्हा एकदा त्यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. ‘येत्या 6-7 महिन्यांत हा देश तरुणांना रोजगार देऊ शकणार नाही’ असं म्हटलं आहे. ‘देश तरुणांना रोजगार देऊ शकणार नाही. जेव्हा मी देशाला कोरोनामुळे मोठं नुकसान सोसावं लागेल असा इशारा दिला तेव्हा मीडियाने माझी खिल्ली उडवली. आजही मी सांगू इच्छितो की येत्या काळात देश तरुणांना रोजगार देऊ शकणार नाही. तुम्ही याच्याशी संमत नसाल तर केवळ सहा-सात महिन्यांची वाट पाहा’ असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
राजीव गांधी यांच्या जयंती निमित्ताने एका कार्यकमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. ‘देशात दोन प्रकारची अर्थव्यवस्था आहे. एक संघटीत अर्थव्यवस्था आहे ज्यामध्ये मोठमोठया कंपन्यांचा समावेश आहे. तर दुसरी असंघटीत अर्थव्यवस्था आहे. ज्यामध्ये छोटे, मध्यम वर्गीय नोकरदार, शेतकरी आणि लाखो लोक आहेत. देशात जवळपास 90 टक्के रोजगार असंघटीत अर्थव्यवस्था देशाला देते. आता ही यंत्रणाच नरेंद्र मोदी सरकारनं नष्ट केली, संपुष्टात आणली’ असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
‘कंपन्या कोसळतील. छोटे आणि लघु उद्योग संपुष्टात येतील. ते तर आजही होतच आहे. मग देशात काय उरेल. हा देश रोजगार देऊ शकणार नाही. गेल्या काही वर्षांत जे झालं नाही तर आता पाहायला मिळेल, आपला देश तरुणांना रोजगार देऊ शकणार नाही. कारण रोजगार देणारे हे जे लोक आहेत छोटे आणि लघु उद्योग करणारे, शेतकरी रोजगार देऊ शकणार नाही कारण तेच पुरते उद्ध्वस्त झालेत’ असं देखील राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
मोदी सरकारमधील आणखी एक केंद्रीय मंत्री कोरोना पॉजिटीव्ह


