अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- पाथर्डी शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून ते तातडीने बुजविण्यात यावेत. तसेच महामार्गाची व्यवस्थित दुरुस्ती करावी, या मागणीचे निवेदन देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या पाथर्डी कार्यालयात गेले. मात्र निवेदन घेण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग कार्यालयात कोणीही जबाबदार अधिकारी उपस्थित नसल्याने संतप्त कार्यकर्त्यांनी कार्यालयाची तोडफोड केली. तसेच अभियंत्याच्या खुर्चीला चपलाचा हार घालत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मनसेच्या या आंदोलनाने वातावरण चांगलेच तापले आहे.
पाथर्डी शहरातील मुख्य चौकासह उपनगरातील रस्त्यांवर मोठे खड्डे पडले असून त्यामुळे रोजच अपघात होत आहेत. रस्त्यावरील मोठ्या खड्ड्यांचे रूपांतर डबक्यात झाले आहे त्यामुळे बेरोजगार तरुणांना या खड्ड्यांच्या काठावर मासेमारी व पर्यटन व्यवसायासाठी परवानगी मिळावी, अशी मागणी राष्ट्रीय महामार्ग कार्यालयात आंदोलकांनी केली. या कार्यकर्त्यांना उत्तर देण्यासाठी कोणीही अधिकारी उपस्थित नसल्याने संतप्त आंदोलकांनी कार्यालयातील टेबलाची काच फोडत, खुर्च्यांची तोडफोड केली.
गेल्या तीन वर्षापासून महामार्गाचे काम बंद आहे. महामार्गावरील खड्ड्यांमुळे अपघात होऊन अनेक लोकांना जीव गमवावा लागला आहे. अधिकारी मात्र कार्यालयाकडे फिरकत नाहीत, असा आरोप यावेळी कार्यकर्त्यांनी केला. यावेळी मनसेचे तालुकाध्यक्ष संतोष जिरेसाळ, मनसे परिवहन सेनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश पालवे, शहर सचिव संदीप काकडे, राजू गिरी, सोमनाथ फासे, जयंत बाबर, गणेश कराडकर, एकनाथ सानप, एकनाथ भंडारी यांच्यासह तालुक्यातील मनसे सैनिक उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या :
- शेतकरी हिताचा निर्णय घ्या, कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी शरद पवार मैदानात
- ‘कांद्याला थोडा भाव मिळत आहे म्हणून केंद्र सरकारच्या पोटात पोटशूळ उठला’
- …अन्यथा शेतकरी शांत बसणार नाही, सदाभाऊ खोतांचा केंद्राला इशारा
- ‘कांदा निर्यात बंदी म्हणजे शेतकऱ्यांच्या तोंडातील घास हिरावून घेण्याचा प्रकार’
- पंतप्रधान कांद्याचे वांदे करत आहेत – छगन भुजबळ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

