बीड : राज्यात सद्या संकटांची मालिका सुरु आहे. अशात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्वतः प्रत्यक्ष मैदानात उतरून जनतेचं दुःख समजून मदत करावी अशी मागणी करत विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.
गेले काही महिने शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी मराठा आरक्षणावरून उद्धव ठाकरे व सरकारवर निशाणा साधला होता. आता त्यांनी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांसमोर निर्माण झालेल्या गंभीर नुकसानावरून उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं आहे. विनायक मेटे यांनी नुकताच अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या बीड भागाचा दौरा केला.
यावेळी त्यांनी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आठवण करून देत टीका केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई सोडून शेतकऱ्यांच्या शेतात जावे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे नेहमी शेतकऱ्यांच्या मदतीला धावून जात असत. उद्धव ठाकरे यांनी त्यांचा हा वारसा सिद्ध करावा अन्यथा खुर्ची सोडावी, असे मेटे यांनी म्हटले. तसेच अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्यावी, अशी मागणी करत त्यांनी ठाकरेंवर घणाघात केला आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांच्या टीकेला कृतीतून उत्तर दिलं आहे. उद्या (सोमवारी) ते सोलापूर जिल्ह्याच्या पाहणी दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी पूरग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकरी व ग्रामस्थांशी चर्चा करतील. सोमवारी सकाळी ते मुंबईहुन सोलापूरला ते विमानाने पोहचतील. तेथून सकाळी साडेनऊ वाजता अक्कलकोट तालुक्यातील गावांचा मोटारीने प्रवास करून पाहणी करतील. यानंतर दुपारी तीननंतर अधिकाऱ्यांची बैठक घेऊन ते मुंबईला परततील.
महत्वाच्या बातम्या-
- नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावरच मंत्र्यांनी बोलावली अधिकाऱ्यांची बैठक
- ‘सुशांतला न्याय द्या,’ फडणवीसांच्या बिहारमधील सभेत घोषणाबाजी
- राज्य चालवणं हे काय येड्या-गबाळ्याचं काम नाही – रावसाहेब दानवे
- विरोधकांच्या टीकेला उद्धव ठाकरेंचं दौऱ्याने उत्तर !
- मुंबईतून सिनेसृष्टी अन्यत्र हलवू देणार नाही – रामदास आठवले


