मुंबई : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापत आहे. मुंबई आणि राज्यभरात ठिकठिकाणी मराठा समाज विविध मार्गाने आपला आक्रोश व्यक्त करत आहे. मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर मराठा समाज आक्रमक झाला आहे. ९ डिसेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयातील खंडपीठापुढे झालेल्या सुनावणीत देखील मराठा आरक्षणावर स्थगिती कायम राहिल्याने तरुणांना भविष्याचा प्रश्न भेडसावत आहे.
तर, सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोर मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यासंदर्भात २५ जानेवारी रोजी महत्वाची सुनावणी होणार आहे. याआधी पुन्हा एकदा आरक्षणावरून राजकारण पेटताना दिसत आहे. ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी मराठा नेते हे दोन समाजात फूट पडत आहेत असा आरोप केला आहे.
काही नेत्यांनी मराठा समाजाला ओबीसी समाजातून आरक्षण मिळावे अशी मागणी केली होती. यानंतर, ओबीसी समाजाने या मागणीचा तीव्र विरोध केला होता. आरक्षण अबाधित राहावं यासाठी ओबीसी समाजाने मोर्चे देखील काढले होते. शेंडगे म्हणाले, ‘मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करण्याला आमचा विरोध आहे. अशा प्रकारच्या कोणत्याही निर्णयाला भटक्या विमुक्त समाजाचा टोकाचा विरोध आहे.’
तर, ‘मराठा समाजाचे नेते राज्यातील सामाजिक सलोखा बिघडवण्याचं काम करत आहे. दोन समाजात तेढ निर्माण करण्याचं काम करत आहेत. तशी वक्तव्यही मराठा नेत्यांकडून होत आहेत. ओबीसी समाज हे कदापिही सहन करणार नाही,’ असा इशाराच त्यांनी दिला आहे. दरम्यान, त्यांनी मराठा समाजाचं मागासलेपण ठरवण्यासाठी नेमण्यात आलेल्या एम.जी गायकवाड कमिशनवर गंभीर आरोप केले आहेत. गायकवाड कमिशन हे देशाच्या इतिहासातील सर्वात मोठं फिक्सिंग असून गायकवाड कमिशनच्या अहवालाला आमचा विरोध आहे. या अहवालाला आम्ही सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे,’ असा खुलासा त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत कपात तर, आठवलेंच्या सुरक्षेत वाढ : ठाकरे सरकारचा मोठा निर्णय
- अनेकदा ऑस्ट्रेलिया चाहत्यांकडून रंगावरून टिप्पणी होते; वर्णद्वेषीच्या टीकेवरून क्रिकेटपटू भडकले
- आजारी कर्मचाऱ्याला भेटण्यासाठी रतन टाटा मुंबईहून पुण्यात पोहोचले, पण…
- वढु बुद्रूक येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाला भिडे गुरुजींची भेट
- भंडारा घटनेतील सुरक्षित स्थळी हलविण्यात आलेल्या बालकांमध्ये जुळ्यांचाही समावेश


