नाशिक : ओबीसी़ंची जातनिहाय जनगणना व्हावी, अशी भूमिका मंत्री छगन भुजबळ यांनी मांडली होती. तसेच राज्य सरकारने पुन्हा याबाबत केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिल्लीत जाऊन पाठपुरावा करावा, असे देखील छगन भुजबळ म्हणाले होते.
याच पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देखील भाष्य केलं आहे. चंद्रकांत पाटील हे नाशिक दौऱ्यावर असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले म्हणाले, महाविकास आघाडीने दिलेली कर्जमाफी ही फसवी आहे. जे नियमित कर्ज भरतात त्यांना कोणताही दिलासा नाही,’ असे पाटील म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले, ‘महाविकास आघाडी सरकार मुस्लिमांना देत असलेले ५ टक्के आरक्षण हे घटनाबाह्य आहे. हे आरक्षण कोर्टात टिकणार नाही. मुस्लिम आरक्षणामुळे मराठा व ओबीसी आरक्षण धोक्यात येईल, असे सांगत महाविकास आघाडी सरकार मुस्लिमांची फसवणूक करत असल्याची टीका त्यांनी बोलताना केली.
दरम्यान, केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, ‘केवळ इतर मागास वर्गीय अर्थात ओबीसी नाही, तर सर्वच जातींची जनगणना झाली पाहिजे, असे आठवले म्हणाले.‘ओबीसीची जनगणना केल्यास जातीवादाला खतपाणी मिळेल, अशी भीती बाळगण्याची कोणतीही गरज नाही. जातीची जनगणना झाल्यास त्या संबंधित जातीसाठी आवश्यक त्या उपयाययोजना करणे अधिक सोपे होणार असल्याचे आठवले यांनी सांगितले.


