पुणे : राज्याच्या विविध भागांमध्ये सतत होत असलेल्या पावसाने शेतीचे मोठे नुकसान होत आहे. आमच्या ठिकठिकाणच्या प्रतिनिधींनी पाठविलेल्या बातम्यांनुसार या नुकसानाची पाहणी आणि पंचनामे त्वरेनं करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. त्यानुसार काही ठिकाणी प्रशासनातर्फे कामही सुरु करण्यात आलं आहे, पण पावसानं त्या कामातही अडचणी येत आहेत.
मराठवाड्यासह लातूर जिल्ह्यात परतीच्या पावसाने मोठा दिलासा दिलेला आहे. मात्र काही ठिकाणी अतिवृष्टी होऊन पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त पिकांचे तात्काळ पंचनामे करावे अशी मागणी संभाजी पाटील निलंगेकर यांनी केली आहे.
धुळे जिल्ह्यात परतीच्या पावसाने शेतीचे प्रचंड नुकसान केले आहे. धुळे तालुक्यात तसंच जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिसकावला गेला आहे. आधीच कोरड्या दुष्काळाने हैराण असलेल्या धुळे जिल्ह्यातील शेतकरी यावेळी ओल्या दुष्काळामुळे मोठ्या संकटात सापडला आहे.
सोलापुरात काल संध्याकाळी वीजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळं झाडांच्या फांद्या मोडून पडल्या. सततच्या पावसामुळं शेतीची कामं खोळंबल्यानं रबीच्या पेरण्या लांबल्या आहेत. नाशिक शहर आणि जिल्ह्यातही काल अनेक भागात पाऊस झाला. ग्रामीण भागातल्या नुकसान झालेल्या पिकांच्या पंचनाम्याच्या कामातही पावसामुळं अडचण येत आहे.
सातारा शहर आणि परिसरात काल रात्री 10 नंतर मुसळधार पावसाने हजेरी लावली. 1 तासाहुन अधिक काळ हा पाऊस सुरुच होता. अमरावती जिल्ह्यातही वीजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. एके ठिकाणी वीज कोसळून तिघांचा मृत्यू झाला, मृतांमध्ये दोन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे.बीड जिल्ह्यात गेल्या पाच सहा दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळं पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून जिल्हाधिकाऱ्यांनी पंचनामे करून तात्काळ कार्यवाहीचे आदेश दिले आहेत.
नांदेडमध्ये किनवट तालुक्यातल्या देहली शिवारात वीज अंगावर पडून काल 19 वर्षांचा एक युवक ठार झाला. नांदेडमध्ये लोक प्रतिनिधींनी नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी प्रशासनाकडं केली आहे. जिल्ह्यातल्या सोयाबीन पिकाचं शंभर टक्के नुकसान झालं असून पिक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना हेक्टरी 40 हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे. दरम्यान नांदेड जिल्ह्यातल्या धर्माबाद तालुक्यातल्या बाभळी बंधारा पूर्ण क्षमतेनं भरला आहे. यामुळं धर्माबाद, उमरी, बिलोली, नायगाव आणि मुदखेड तालुक्यातल्या 85 गावांना पाणी उपलब्ध होणार असून रबी पिकांना त्याचा लाभ मिळेल.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1189761336277749760?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1189755783195455488?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

