बारामती : राज्य सरकार महाराष्ट्रातल्या प्रत्येक शाळेत मराठी विषय अनिवार्य करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच अजित पवार त्यांचा मतदारसंघ असलेल्या बारामतीत आले. बारामतीत त्यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. या सत्कारानंतर अजित पवार यांनी केलेल्या भाषणात सरकार राज्यातल्या सर्व शाळांमध्ये मराठी विषय अनिवार्य करणार असल्याची घोषणा केली आहे.
अजित पवार म्हणाले की, महाराष्ट्रातील प्रत्येक शाळेत, मग ती कोणत्याही माध्यामाची शाळा असो, आम्ही तिथे मराठी भाषा दहावीपर्यंत अनिवार्य करणार आहोत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीमधल्या इतर नेत्यांचाही त्याला पाठिंबा आहे.अजित पवार भाषणात म्हणाले की, बारामतीकरांनी मला खूप प्रेम दिलं आहे. त्यांच्या प्रेमाची परतफेड या जन्मात होऊ शकत नाही. पवार म्हणाले की, पुढील पाच वर्षात खूप काम करायचं आहे. बारामतीसह पुण्याचे पाणीप्रश्न देखील सोडवायचा आहे.
बारामतीची पाणीपुरवठा योजना १२० कोटी रुपयांची होती, ती आता २०० कोटींची करण्यात आली आहे. बारामतीच्या मेडिकल कॉलेजला २०० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. त्यापैकी १०० कोटी रुपये दिले आहेत . आणि त्यानंतरच मी इथे बारामतीत आलो आहे .
तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनादेखील मदत झाली पाहिजे. दोन लाख रुपयांपेक्षा जास्त कर्ज असलेल्या शेतकऱ्यांचंही मदत मिळावी असा म्हणणं आहे. त्यांचं म्हणणं आम्ही ऐकलंय. मी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री जयंत पाटील त्यामध्ये लक्ष घालतोय. नियमित कर्जफेड करणाऱ्या आणि दोन लाखांपेक्षा जास्त कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांनादेखील मदत केली जाईल असाही पवार भाषणात म्हनाले.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

