टीम महाराष्ट्र देशा : शासनाची भूमिका लॉकडाउन करुन जनतेला अडचणीत आणण्याची नसून ती सुरक्षेकरीता आहे, याबाबत प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा असे आवाहन जिल्ह्याचे नवनियुक्त पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले.
गडचिरोली जिल्ह्यातील कोरोना संसर्ग व त्याबाबत लागू केलेल्या संचारबंदीच्या अनुषंगाने त्यांनी बैठकीचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयात केले होते. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील आरोग्य सुविधा, स्थलांतरीत लोकांची व्यवस्था याबाबत आढावा घेतला. प्रशासनाने केलेल्या संचारबंदीच्या कामामुळे व लोकांच्या सहकार्याने जिल्हा कोरोनामुक्त राहिला आहे. यापुढेही आपल्याला ही लढाई सुरु ठेवायची आहे. या दरम्यान काही लोकांना अडचणी निर्माण होत आहेत. मात्र प्रशासन यासाठी आवश्यक मदत वेळेत पोहचवित आहे. जिल्ह्यातील जीवनावश्यक वस्तूंचा पूरवठा पुढेही अखंड सुरु राहिल याकरीता नागरीकांनी काळजी करु नये असे आवाहन त्यांनी बैठकित केले.
तसेच शेतीविषयक कामांना अडथळे नाहीत –
जिल्ह्यातील शेतीविषयक कामांना कोणत्याही प्रकारे प्रशासनाकडून बंधने नाहीत. शेतकऱ्यांनी शेतीविषयक कामे करावीत. फक्त यामध्ये अकारण गर्दी टाळा व कोरोना संसर्गाला दूर ठेवा असे पालकमंत्री यांनी जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना आवाहन केले. तेंदू पत्ता कामे सुरू करण्याबाबत परवानगी : संचार बंदीमुळे सर्वच कामांना बंदी घालण्यात आली होती. तेंदू पत्ता संकलन जिल्हयातील महत्वाबाचा व्यवसाय असून त्याबाबत आता परवानगी देता येईल असे त्यांनी बैठकीत सूचना केल्या. तसेच जिल्ह्यात मुबलक जीवनावश्यक वस्तूंचा साठा आहे. याबाबत नागरीकांनी चिंता न करता प्रशासनाच्या सूचनेचे पालन करुन खरेदी करा. घराबाहेर पडून गर्दी करु नका. जीवनावश्यक वस्तू मोठया प्रमाणात असल्याने त्या वेळेत आपल्याला उपलब्ध होतील. असेही त्यांनी या बैठकीत सांगितले. रेशनींग मधून मिळणारे धान्य वेळेत मिळणेबाबत प्रशासनाला त्यांनी यावेळी सूचना केल्या. यामध्ये जिल्ह्यातील गरजू लोकांना आवश्यक व शासनाने मंजूर केलेले धान्य वाटप होण्यासाठी व त्याबाबत आवश्यक उपाययोजना करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या.
प्रशासनाच्या परवानगीशिवाय जिल्ह्याबाहेरील व्यक्ती आत येता कामा नये. जिल्हा कोरोना मुक्त राहण्यासाठी बाहेरील व्यक्ती आत येता कामा नये. जिल्ह्यात येण्यासाठी गरजूंच्या कारणांची छाणणी करा. अत्यावश्यक कारण असेल तरच त्यांची तपासणी करुन प्रवेश देण्यात यावा असे त्यांनी यावेळी पोलीस अधीक्षकांना सांगितले.
यावेळी जिल्हाधिकारी दीपक सिंगला, जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार, पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय राठोड, जिप सदस्य ॲड.रामभाऊ मेश्राम तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी आदी उपस्थित होते.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

