मुंबई : मराठा, कुणबी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी स्वायत्त अशा सारथी संस्थेची स्थापना करण्यात आली होती. या संस्थेमध्ये गेल्या काही दिवसांपासुन महाविकास आघाडी सरकारची स्थापना झाल्यानंतर अनागोंदी कारभार सुरू झालेला आहे. याबाबतीत शिवसंग्राम संस्थापक अध्यक्ष आ. विनायक मेटे यांनी सातत्याने पाठपुरावा करत बरेचसे प्रश्न सोडवले आहेत.
मात्र गेल्या 3 महिन्यांपासून पगार न मिळाल्यामुळे सारथी संस्थेच्या दारात तारादूतांना आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे. 7 दिवसांपासुन येथे तारादूत आंदोलनाला बसलेले आहेत. मेटे यांनी यामध्ये लक्ष घातल्यानंतर बहुजन कल्याण विभाग राज्यमंत्र्यांच्या उपस्थितीत उद्या सारथी संस्थेचे प्रश्न सोडवण्यासंदर्भात बैठक लावण्यात आलेली असून आ मेटे हे सारथीतील तारादूतांच्या संघर्षाचे आता सारथ्य करणार आहेत.
पुणे येथील सारथी संस्थेसमोर गेल्या 7 दिवसांपासून वेतन मागणीसाठी तारदूत आंदोलनास बसलेले आहेत. या आंदोलकांच्या मागणी पुर्ततेकडे संस्था प्रशासन व सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसल्यानंतर तारदूतांनी आ मेटे यांना आपली कैफियत मांडली. याबाबतीत आ मेटे यांनी तात्काळ राज्य शासनाला धारेवर धरत प्रश्न सोडवण्याबाबत आक्रमक भूमिका घेतली.
राज्याचे बहुजन कल्याण विभागाचे राज्यमंत्री, आ विनायक मेटे, मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील, सारथी संस्थेचे सचिव, प्रभारी व्यवस्थापकीय सचिव, उपसचिव(महामंडळे) यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक मंत्रालयात उद्या सायं 5 वाजता होणार असून या बैठकीत सारथी संस्थेच्या विविध प्रश्नांवर चर्चा होऊन ती सोडवली जाणार आहेत. सारथी संस्थेच्या स्वायत्ततेसह या संस्थेला आवश्यक कार्यांच्या पूर्ततेसाठी निधी उपलब्ध करूनच द्यायला पाहिजे अशी भूमिका शिवसंग्रामकडून घेण्यात आलेली आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

