अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- अहमदनगर जिल्ह्यातील के.के.रेंजमुळे राहुरी, पारनेर व नगर ग्रामीण तालुक्यातील २३ गावांना विस्थापित होण्याची वेळ आली आहे. या गावांतील प्रमुख ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संपर्क अध्यक्ष अनिल चितळे यांची नुकतीच भेट घेतली. याप्रश्नी लवकरच शिष्टमंडळ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेणार आहे.
अनिल चितळे यांच्या भेटीमध्ये विस्थापित होणाऱ्या ग्रामस्थांनी आपल्या व्यथा मांडल्या. पोटच्या आईप्रमाणे जमिनींचा सांभाळ केला. त्या जमिनीपासून क्षणात दूर होण हा विचार देखील आम्ही करू शकत नाही. रक्ताचं पाणी करत खडक फोडून जमिनी सुपीक बनविल्या आणि आज सैनिकी प्रशिक्षणाच्या नावाखाली आमच्याकडून जमिनी घेतल्या जात आहेत. अहमदनगर जिल्ह्यासाठी मुळा धरण वरदान आहे. अशा सैनिकी प्रशिक्षणामुळे धरणाला धोका निर्माण होऊ शकतो, अशा भावना शेतकऱ्यांनी मांडल्या.
कंगनाला महाराष्ट्रासह मुंबईत राहण्याचा अधिकार नाही: गृहमंत्री अनिल देशमुख
यावेळी चितळे यांनी ग्रामस्थांना सर्व २३ गावांमध्ये सह्यांची मोहीम राबविण्यास सांगितले. तसेच फोन करून या प्रकरणाची माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांना दिली. यावेळी मनसे उपजिल्हाध्यक्ष अरुण चव्हाण, राहुरी शहर अध्यक्ष प्रतिक विधाते, प्रविण कार्ले, प्रणव गाडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
नगर शहरात अतिवृष्टीमुळे नागरिकांच्या घरांमध्ये पाणी; शहरातील रस्ते झाले जलमय…


