ठाणे : कुख्यात गॅंगस्टर सुरेश पुजारी टोळीकडून मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी ठाणे खंडणी विरोधी पथकाने मुंबईतून संदेश शेट्टी याला अटक केली, तर पुजारी टोळीतील इतर आरोपींचा शोध सुरू आहे. नवी मुंबईतील व्यापाऱ्याला खंडणीसाठी धमकावणाऱ्या पुजारी टोळीच्या शेट्टी याला जाधव यांनी विनंती केली. तेव्हा, या प्रकरणात पडू नको अथवा ठार मारण्याच्या धमकीचा फोन पुजारीने परदेशातून केला होता.
अनेक गरजू तसेच अडचणीत असलेले नागरिक जाधव यांच्या मनसे कार्यालयात तक्रारी घेऊन येतात. ठाण्यातील अविनाश जाधव हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळखले जात असून त्यांच्यावर ठाणे जिल्ह्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. नवी मुंबई येथील व्यापारी किशन गुजर यांना काही दिवसांपूर्वी सुरेश पुजारी टोळीतील संदेश शेट्टी याने संपर्क साधून त्यांच्याकडून २४ लाख रुपयांची खंडणी मागितली होती. दरम्यान, याची तक्रार गुजर यांनी अविनाश जाधव यांना दिली होती. त्यानंतर जाधव यांनी संदेश शेट्टी याच्याशी संपर्क करून गुजर यांना फोन करू नको, अशी विनंती केली होती.
त्यानंतर १६ जून व १८ जून या कालावधीत जाधव यांच्या मोबाईल क्रमांकावर आंतरराष्ट्रीय मोबाईल क्रमांकावरून फोन आले. फोन करणाऱ्या व्यक्तीने आपले नाव प्रसाद पुजारी असे सांगून जाधव यांना गुजर प्रकरणामध्ये पडल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी मंगळवारी नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. शेट्टी हा कुख्यात गुंड असून, सुरेश पुजारी टोळीसाठी व्यापाऱ्यांना धमकावून खंडणी उकळण्याचे काम करत असल्याची माहिती समोर आली आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

