🕒 1 min read
मुंबई : अभिनेते शरद पोंक्षे यांनी सावरकरांचं योगदान श्रेष्ठ असल्याचं म्हटलं. “अस्पृश्यता निवारणात सावरकरांचं मोठं योगदान आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्यापेक्षा सावरकरांचे योगदान श्रेष्ठ आहे. डॉ. आंबेडकर आणि महात्मा फुले हे त्या-त्या जातीत जन्माला आल्यानं त्यांना अपमानाचे चटके बसले. त्यामुळे विद्रोह करत प्रवाहाविरोधात लढले. मात्र अस्पृश्यतेचा कोणताही चटका बसला नसतानाही सावरकर ब्राह्मणाविरोधात उभे राहतात. समाजातील जातीच्या भिंती फोडण्यासाठी आयुष्य व्यतीत करतात. त्यामुळे दोन्ही राष्ट्रपुरुषांपेक्षा सावरकर श्रेष्ठ आहे,” असा दावा पोंक्षे यांनी केला होता.
देशातील अस्पृश्यता निवारणाबाबत अभिनेते शरद पोंक्षे यांनी व्यक्त केलेल्या मतामुळे विवादाला तोंड फुटले आहे. पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातील कार्यक्रमात अभिनेते शरद पोंक्षे यांनी हे विधान केलं होतं. ‘मी सावरकर’ वक्तृत्व स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात बोलत होते.

याच पार्श्वभूमीवर राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पोंक्षे यांच्या निशाणा साधला आहे. आव्हाड यांनी एक ट्विट केलं असून, ‘हा डोक्यावर पडला काय?,’ असा संताप त्यांनी व्यक्त केला आहे. आव्हाड यांनी ट्विट केलं आहे. “अस्पृश्यता निवारणात आंबेडकर आणि फुलेंपेक्षा सावरकरांचे योगदान श्रेष्ठ : शरद पोंक्षे… हा डोक्यावर पडला काय बोलतो त्याचे त्यालाच कळते कि नाही माहित नाही,” अशी टीका आव्हाड यांनी केली आहे. तसेच संदर्भात लोकसत्ता वृत्ताने माहिती दिली आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस अमोल मिटकरी यांनी उत्तर देत वेळेवर औषध घेण्याचा सल्ला दिला आहे. मिटकरी यांनी यासंदर्भात ट्विट करून टीका केली आहे. “पोंक्षे, म. फुलेंनी तुमच्या अनेक पिढ्यांचा उद्धार केलाय. फुले आणि बाबासाहेबांचा द्वेष करणारी तुमची हलकट प्रवृत्ती जाता जात नाही. आजारपणामुळे डोक्यावर परिणाम झाल्याचे जाणवते आहे. औषध वेळेवर घेत चला. वेळेवर दवापाणी नसलं की मेंदूवर परिणाम होतो,” असा उपरोधिक सल्ला मिटकरींनी पोंक्षे यांनी दिला आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

