टीम महाराष्ट्र देशा : तिहेरी हत्याकांडाच्या दोन घटनांनी शिर्डी आणि नवी मुंबई ही दोन शहरं हादरली आहेत. दोन्ही ठिकाणी तिहेरी हत्याकांडाच्या घटना घडल्या आहेत. शिर्डीमध्ये झालेल्या हत्याकांडातील आरोपीला अटक करण्यात आली आहे. तर नवी मुंबईतील तिहेरी हत्याकांड प्रकरणाचा पोलीस तपास सुरु आहे असे पोलिसांनी म्हटले आहे. यावरून आता राजकारणाला सुरवात झाली असून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चांगलच धारेवर धरल आहे.
राज्यात दोन ठिकाणी तिहेरी हत्याकांड झाले. कायदा व सुव्यवस्था ढासळली आहे. मात्र राज्याचे मुख्यमंत्री इतर पक्षाचे आमदार गोळा करण्यात मग्न आहेत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी केली आहे. कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. कोणावरही धाक राहिलेला नाही. राज्याचे मुख्यमंत्री हेच गृहमंत्री आहेत. पण राजकारणासाठी जेवढा वेळ मुख्यमंत्री देतात तेवढा वेळ गृहमंत्री म्हणून दिला तरी देखील राज्यातील व विशेषतः नागपूर शहरातील कायदा व सुव्यवस्था सुधारण्यास मदत होईल, अशा शब्दात आ. जयंत पाटील यांनी सरकारला धारेवर धरले.


