टीम महाराष्ट्र देशा: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्याविरोधात अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार असल्याचा पवित्रा पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी घेतला आहे. नवाब मलिक यांनी रावल यांच्यावर जमिनी हडपल्याचा आरोप केल्याने रावल आक्रमक झाले आहेत.
सरकारी प्रकल्प जाहीर झालेल्या गावातील जमिनी कवडीमोल दराने विकत घ्यायच्या आणि सरकारला त्या वाढीव किंमतीला विकण्याचा पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांचा धंदा असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी केला होता. वयोवृद्ध शेतकरी धर्मा पाटील यांच्या मृत्यूप्रकरणी रावल आणि ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर ३०२ प्रमाणे मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा व त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणीही त्यांनी केली होती.
त्याचप्रमाणे, मागील १० ते १५ वर्षांपासून रावल कुटुंबीय धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची फसवणूक करत असून पैसे कमावण्याचा सोपा मार्ग त्यांनी अवलंबल्याचे त्यांनी म्हटले. रावळ कुटुंबाचे रॅकेटच यासाठी कार्यरत आहे. धुळे जिल्ह्यातील अनेक जमिनी या जयकुमार रावल किंवा त्यांच्या कंपनीच्या नावे आहेत. आजही त्या जागांचे ७/१२ उतारे व फेरफार दाखले पाहिल्यास त्याची नोंद आढळून येते. धर्मा पाटील यांच्या जागेबाबत बैठक ठरली होती. पण रावल यांच्या सांगण्यावरून बावनकुळे यांनी ही बैठक रद्द केली. यांच्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे दोघांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी नवाब मलिक यांनी केली आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
