टीम महाराष्ट्र देशा : ‘एक देश एक निवडणूक’ हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही महत्त्वाकांक्षी संकल्पना आहे. या संकल्पना पूर्तीसाठी मोदींनी काही दिवसांपूर्वी सर्वपक्षीय बैठक देखील बोलावली होती. मात्र आता मोदींच्या या महत्त्वाकांक्षी संकल्पनेला मित्रपक्षचं विरोध करणार असल्याच दिसत आहे. कारण शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ‘एक देश, एकाच वेळी निवडणूक’ ही संकल्पना वास्तवात आणणे अशक्य असल्याचं म्हटले आहे.
संजय राऊत यांनी या योजनेच्या अंमलबजवाणीबद्दलही शंका व्यक्त केली आहे. या संदर्भात ते म्हणाले की, एक देश, एकाचवेळी निवडणूक या संकल्पनेवर चर्चा होण्याची गरज आहे. भारतासारख्या मोठ्या देशात एका मताने सरकार तयार होते किंवा पाडलेही जाऊ शकते. मग अशा स्थितीत एक देश, एकाचवेळी निवडणूक शक्य असेल का? जर सरकार पडले, तर त्या ठिकाणी तीन वर्षांसाठी राष्ट्रपती राजवट राहू शकत नाही. या संकल्पनेसंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित होतात आणि त्यावर चर्चा व्हायला हवी. व्यवहारदृष्ट्या या संकल्पनेची अंमलबजावणी करणे सध्यातरी अशक्य असल्याचे मला दिसते.
दरम्यान मोदींच्या या संकल्पनेबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांना पत्र लिहले आहे. या पत्रात पवार यांनी मोदींची संकल्पना चांगली आहे. मात्र ती प्रत्यक्षात आमलात आणणे अवघड आहे, असे लिहिले आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

