🕒 1 min read
मुंबई: राजन पाटील हे मराठी कलाविश्वातील नावाजलेले नाव आहे. अभिनयासोबतच ते उत्तम लेखकदेखील आहेत. रंग माझा, माझ माणसं ही पुस्तक त्यांनी लिहिली आहेत. सोबतच रायगडाला जेव्हा जाग येते,तोची एक समर्थ, तरुण तुर्क म्हातारे अर्क, मित्र, शर्यत, बरड, मुंबई आमचीच, अशा अनेक नाटक, चित्रपट आणि मालिकांमध्ये त्यांनी काम केले आहे.
ज्येष्ठ अभिनेते राजन पाटील यांनी आजारपणाला कंटाळल्याची एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. माझी मृत्यूशी चाललेली लढाई मी थांबवत आहे. मी शस्त्र टाकली आहेत…, असं म्हणत त्यांनी एक पोस्ट शेअर केली होती. त्यानंतर अनेकांनी त्यांना सावरण्याचा प्रयत्न केला आणि हे दिवसही निघून जातील म्हणत त्यांना धीर दिला. त्यानंतर राजन पाटील यांनी आणखी एक पोस्ट शेअर करत मी पुन्हा हत्यार उपसले आहे. आता फक्त एल्गार, असे म्हणत आलेल्या परिस्थितीला खंबीरपणे तोंड देणार असल्याचे म्हटले आहे.
राजन पाटील म्हणतात, ”नमस्कार मंडळी, माणसाच्या आयुष्यात कधी कधी असा एखादा क्षण येतो की तो माणूस राहत नाही. माणसाचा ऑथेल्लो किंवा हॅम्लेट का होतो याला तर्कशुद्ध उत्तर नाही. तो तसा होतो याला कारण त्याच्या आयुष्यातला ‘ तो ‘ क्षण. माझ्या आयुष्यात तो क्षण आला. सर्वकाही असह्य झालं. पराभव समोर उभा राहिला. आणि त्या क्षणाने घात केला. fb वर पोस्ट सोडली. कच खाल्ली. पण तुम्ही सगळे त्यावर इतक्या त्वेषानं व्यक्त झालात की माझ्यावरच्या त्या क्षणाची पकड क्षणात सुटली. सावध झालो. लज्जित झालो. खाडकन मुस्काटात बसल्यानंतर जाग यावी तसा भानावर आलो. स्वतःला खडसावले, ‘ साल्या, लोक तुला बघून, तुला आदर्श मानून आयुष्यात लढा सोडत नाहीत. हरणारी लढाई सुद्द्धा लढतात आणि प्रसंगी जिंकतात ही. आणि तू ? तुला लढायला हवं. तुझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांना तू फसवणार ? लाज वाटत नाही? नेता बनायची हौस आहे ना, मग नेत्यासारखे वाग. आता माघार नाही. शेंडी तुटो वा पारंबी, पण लढाई सोडायची नाही ‘ मंडळी, तुम्ही जो आवाज माझ्या कानाखाली काढलात त्याचे पडसाद आता माझ्या मृत्युबरोबरच्या लढाईत उमटणार हे निश्चित. मी पुन्हा हत्यार उपसले आहे. आता फक्त एल्गार ! हर हर महादेव !”
https://www.facebook.com/permalink.php?story_fbid=485542952835834&id=100041403992342
यापूर्वी राजन पाटील यांनी आजारपणाला कंटाळून टाकलेल्या पोस्टमध्ये म्हटले होते, “नमस्कार मंडळी, माझी मृत्यूशी चाललेली लढाई मी थांबवत आहे. मी शस्त्र टाकली आहेत. मानसिक दृष्ट्या मी हरलोय. माझं जगणं आता जगणं उरलं नाही. केवळ जिवंत राहणं एवढंच राहिलेय. मला त्यात स्वारस्य नाही. तुम्ही माझ्यासाठी एक करा, मृत्यूने मला लवकर घेऊन जावे, अशी प्रार्थना करा. नमस्कार… राजन पाटील”, अशी पोस्ट त्यांनी फेसबुकवर शेअर केली होती.
https://www.facebook.com/permalink.php?story_fbid=485362829520513&id=100041403992342
महत्वाच्या बातम्या
- भाजपाबद्दलचे मुस्लीम धर्मियांचे गैरसमज दूर करण्याचे भाजपने केले प्रयत्न सुरु
- २०३० पासून मिळणार नाही पेट्रोल, डिझेलवर चालणाऱ्या कार्स !
- मतदार यादीतील नाव, पत्ता दुरुस्ती करण्याची संधी मिळणार
- करोनाचा धोका पुन्हा वाढला; ‘या’ शहरात कर्फ्यू लागू
- शरद पवारांसामोरच आशिष शेलारांचा ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून उल्लेख…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

