🕒 1 min read
मुंबई: लॉक डाऊन काळात अनेकांनी आपला रोजगार गमावला. अनेकांचे लहान-मोठे व्यवसाय बंद पडले ही चिंतेचीच बाब आहे. मनोरंजनाचा मोठा व्यवसाय कोसळला आहे. मुंबईतल्या चित्रपट उद्योगावर लाखो लोक अवलंबून आहेत. चित्रपटाची मायानगरी हे मुंबईचे वैभव आहे. ते वैभवच मधल्या काळात झाकोळून गेले. पडद्यामागच्या अनेक कलाकारांच्या, तंत्रज्ञांच्या चुली विझल्या. सिनेमागृहे, नाटय़गृहे ओस पडली. त्यावर अवलंबून असलेले कर्मचारी बेकार झाले. मराठी नाटय़सृष्टीलाही धक्काच बसला. आता या सगळ्यातून उभे राहायचे असले तरी ते सोपे नाही. लोकांना सिनेमा आणि नाटय़गृहापर्यंत पुन्हा कसे आणायचे, हे मोठेच आव्हान असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामना अग्रलेखात म्हटले आहे.
मराठी नाटक हे आपल्या संस्कृतीचे गौरवस्थान आहे. मराठी रंगभूमीचे एक म्युझियम सरकार मुंबईत उभे करीत आहे. मराठी भाषा भवनही उभारणार आहेत. ते चांगलेच आहे. पण मराठी सिनेमा, मराठी नाटक हा जो मराठी संस्कृतीचा कणा आहे तोच मोडून पडला आहे. त्यांना विशेष आधाराची गरज आहे. जे नाटक सिनेमांचे तेच हॉटेल्स, रेस्टॉरंटवाल्यांचे. मुंबई चोवीस तास जागी आहे असे म्हणतात ते याच खाद्य संस्कृतीमुळे, पण लॉक डाऊनच्या निर्बंधांमुळे मुंबईसह महाराष्ट्रातील हा जिताजागता व्यवसायही बंद पडला. रेस्टॉरंट, जागोजागचे गजबजते ढाबे बंद पडल्याने अनेकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला. आता हा व्यवसाय नव्याने सुरू होत असला तरी पोलीस व स्थानिक प्रशासनाने या व्यावसायिकांचे फालतूचे शोषण करू नये हीच अपेक्षा. असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.
दरम्यान महाराष्ट्रात जम्बो कोविड सेंटर्स, प्राणवायूचा पुरवठा, औषधांचा पुरवठा, कडक निर्बंध, सोशल डिस्टन्सिंग याबाबत ठाकरे सरकार जागरूक राहिल्यानेच कोरोना काही प्रमाणात आटोक्यात येऊ शकला व आज दिवाळीच्या तोंडावर लॉकडाऊनचे टाळे उघडता आले. निर्बंध उठलेच आहेत. तेव्हा एकमेकांच्या सहकार्याने, नियम-कायद्यांचे पालन करून मुंबई-महाराष्ट्रास कामधंद्यास लागू द्या. जगा आणि जगू द्या. उगाच आडवे येऊन लोकांचा छळ करू नका. असे आवाहन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामना अग्रलेखातून केले आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘पंतप्रधानांनी ‘थाळ्या वाजवा कोरोना पळवा’ संदेश दिला होता पण..’,’शिवसेने’चा मोदींवर निशाना
- ‘भाजपाच्या थयथयाटामुळे नाही, तर डॉक्टरांच्या ‘टास्क फोर्स’ने मान्यता दिल्यावर मंदिरे उघडली’
- ‘महाराष्ट्रास कामधंद्यास लागू द्या’, उगाच आडवे येऊन लोकांचा छळ करू नका’
- पवार साहेब, हर्बल तंबाखूच्या उत्पादनाला परवानगी द्या, शेतकरी श्रीमंत होईल- सदाभाऊ खोत
- पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! गुरुवारी पाणी पुरवठा राहणार बंद
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
