🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा- महाराष्ट्राच्या विधीमंडळात आज नाट्यमय घडामोडी घडल्या. विरोध पक्षांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याविरोधात अविश्वास ठराव मांडला होता. अविश्वास ठरावावर चर्चा होण्यापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अचानक विधानसभा अध्यक्षांवर विश्वासदर्शक ठराव मांडला. हा ठराव आवाजी मतदानाने मंजूर झाला. या ठरावाला शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी अनुमोदन दिले. दरम्यान, विरोधी पक्षांनी सरकारच्या या कृतीचा निषेध केला असून सरकारने पळपुटेपणा केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केला.
शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनीही त्या ठरावाला अनुमोदन दिले, हे अन्यायकारक आहे. आम्हाला यावर चर्चा करायची होती मात्र तालिका अध्यक्षांनी सभागृह १५ मिनिटांसाठी तहकूब केले. सरकारने हे कृत्य करून पळपुटेपणा आहे. @NCPspeaks #BudgetSession2018
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) March 23, 2018
विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे हे विधानसभेचे अध्यक्ष असतानाही एखाद्या पक्षाच्या अध्यक्षाप्रमाणे वागत असून मनमानीपणे कामकाज रेटत आहेत. विरोधकांचा आवाज दाबून सदस्यांमध्ये भेदभाव करण्याचा प्रयत्नही करत आहेत, आदी कारणे देत विरोधकांनी बागडे यांच्या विरोधात अविश्वास ठरावाची नोटीस दिली होती. विधानसभा नियमानुसार येत्या दोन आठवड्यात अध्यक्षांचा अविश्वास प्रस्ताव सभागृहात चर्चेसाठी येईल. मात्र तत्पूर्वी अध्यक्षांनी नैतिकता दाखवून सभागृहात कामकाज करू नये. त्यांच्याजागी तालिका अध्यक्ष कामकाज करू शकतात. याबाबत बागडे यांनी सदसद्विवेकबुद्धीने निर्णय घ्यावा, असं राष्ट्रवादीचे नेते अजित पवार म्हणाले होते.
मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अध्यक्षांच्या बाजूने आज विश्वास ठराव आणून विरोधकांवर कुरघोडी केली. सार्वजनिक बांधकाम मंत्री (उपक्रम) एकनाथ शिंदे यांनी या ठरावाला अनुमोदन दिले. त्यानंतर आवाजी मतदानाने हा ठराव मंजूर करण्यात आला.


