प्रदीप मुरमे : भूकंपग्रस्त लोहारा तालुक्यातील दत्तात्रय सुतार या प्रगतशील शेतक-याने १० एकर चिकूची बाग आरोग्य कर्मचारी, गरोदर माता व रुग्णांसाठी दान करुन सामाजिक बांधिलकीचे सुरेख दर्शन घडविले ! याबाबत अधिक माहिती अशी की,सास्तूर (ता.लोहारा) येथील दत्तात्रय सुतार हे सेवानिवृत्त तालुका कृषी अधिकारी असून त्यांची १० एकर चिकूच्या बागेला सध्या मोठी फळधारणा झाली आहे.
देशासमोरील कोरोना महामारीच्या विरोधात आरोग्य विभागाचे कर्मचारी अक्षरशः रात्रीचा दिवस करुन लढा देत आहेत.या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकीपोटी या आरोग्य विभागाच्या कर्मचा-यासाठी काहीतरी करावे या उदात्त भावनेतून चिकूची बाग दान करण्याची भावना सुतार यांनी लोहा-याचे तहसीलदार विजय अवधाने यांच्याकडे बोलून दाखविली.
तहसीलदार यांनी सास्तूर येथील स्पर्श ग्रामीण रुग्णालयाच्या माध्यमातून मोफत चिकू वाटपाची योजना तत्काळ अंमलात आणली. मागील ३-४ दिवसापासून प्रत्यक्षात चिकू वाटपास सुरुवात झाली आहे. उमरगा व लोहारा या दोन तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालय,ग्रामीण रुग्णालय,प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रातील डॉक्टर,गरोदर माता,रुग्ण व फिल्डवर काम करणा-या सर्वच कर्मचा-यांना चिकूचे वाटप करण्यात येणार आहे.
दररोज २५० ते ३०० क्विंटल चिकूचे वाटप करण्यात येत असल्याचे स्पर्श ग्रामीण रुग्णालयाचे प्रकल्प अधिकारी रमाकांत जोशी यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.तहसीलदार विजय अवधाने यांच्या हस्ते या फळ वाटपास प्रारंभ झाला आहे.प्रभारी गटविकास अधिकारी अशोक काळे,तालुका कृषी अधिकारी मिलींद बीडबाग,रमाकात जोशी,दत्तात्रय सुतार,गोविंद सुतार,राजेंद्र सुतार,सुधाकर सुतार आदींची यावेळी उपस्थिती होती. खा.ओमराजे निंबाळकर,आ.ज्ञानेश्वर चौगुले यांच्यासह अनेकांनी सुतार परिवाराने दाखविलेल्या दातृत्वाचे कौतुक केले आहे.
‘भूकंपावेळी अनेकांनी दिले,आपणही द्यायला हवे’
उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यामध्ये १९९३ मध्ये प्रलयकारी भूकंप झाला होता. यात सास्तूरसह या दोन्ही जिल्ह्यातील अनेक गावे उध्वस्त झाली होती. यात अनेकजण मृत्युमूखी पडली होती.त्यावेळी आमच्यासाठी जगभरातून मदतीचे हात पुढे आले होते. त्यातून अनेकांचा आधार मिळाल्यामुळे आम्ही उभे राहू शकलो . ती आठवण आजही कायम असल्यामुळे आपणही मदतीसाठी पुढे आले पाहिजे या भावनेतूनच आपण हा निर्णय घेतला आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी जपण्यापोटी १० एकरांवरील चिकूची बाग हा हंगाम संपेपर्यंत गोरगरीब,रुग्ण व त्यांच्यावर उपचार करणा-या डॉक्टर व कर्मचा-यांसाठी खुली केली असल्याचे दत्तात्रय सुतार यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
हेही पहा –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

